चष्म्याच्या दुकानाच्या भितीने परदेशी पळाला तरूण!

चष्म्याच्या दुकानाच्या भितीने परदेशी पळाला तरूण!

चष्म्यामुळे मुलुंडमधून पळाला तरूण

जवळपास महिन्याभरापूर्वी मुलुंड परिसरातून एक तरूण बेपत्ता झाला होता. पाकिस्तान किंवा दुबईला जाऊन तो दहशतवाद्यांच्या हाती लागल्याचा संशय मुंबईतल्या तपास यंत्रणांना आला होता. त्या अनुषंगाने या संस्थांनी तसा तपास देखील सुरू केला होता. मात्र, तब्बल महिन्याभरानंतर हा तरूण स्वत:हूनच मुंबईत परतला आणि त्यानंतर त्यानं सांगितलेलं पळून जाण्याचं कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला. एका साध्या चष्म्याच्या दुकानाच्या भीतीमुळे हा तरूण थेट परदेशात पळून गेला. या तरुणाचं नाव आहे जगदीश परिहार!

‘हिंदू धर्माला मानत नाही म्हणून…’

महिन्याभरापूर्वी मुंबईच्या मुलुंड भागातून २० वर्षीय जगदीश बेपत्ता झाला. २२ ऑक्टोबर रोजी मुंबई विद्यापीठात जातो असं सांगून जगदीश बाहेर पडला, तो परत आलाच नाही. त्याने संध्याकाळी थेट फोन करून सांगितलं की ‘मी हिंदू धर्माला मानत नाही, त्यामुळे मी खूप दूर जात आहे. परत कधीच येणार नाही.’ इतकंच सांगून जगदीशनं फोन बंद करून टाकला. त्यानंतर त्याचा फोन लागलाच नाही. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी तशी तक्रार मुलुंड पोलिसांकडे केली. तसेच, घरातून निघण्यापूर्वी जगदीशने त्याचा लॅपटॉप पूर्णपणे फॉरमॅट केला असल्याचं देखील समोर आलं. त्यामुळे पोलिसांचं काम कठीण झालं.


तुम्ही हे वाचलंत का? – पोलीस झोपले अन आरोपी पळाले

जगदीशच्या प्रकरणाच हनी ट्रॅपचा होता संशय!

दरम्यान, जगदीश एका पाकिस्तानी तरुणीच्या संपर्कात होता अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली. त्यातून पोलिसांना धागा मिळाला. या तरुणीवरून जगदीशला अनेकदा ओरडा देखील खावा लागला होता. त्यामुळे हा हनी ट्रॅपचा तर प्रकार नाही ना, असा संशय देखील पोलिसांना आला. मात्र, जगदीशचं शेवटचं लोकेशन सहार विमानतळ दाखवत असल्यामुळे तो दहशतवाद्यांच्या हाती लागला की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली.

जगदीश परिहार

काही दिवसांनी जगदीशचा भाऊ भावेशला व्हॉट्सअप कॉल आला. त्यात ‘आपण दिल्लीला असून ३ महिन्यांमध्ये परत येतो’, असं त्याने सांगितलं. मात्र, त्याचं लोकेशन दुबई असल्याचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यामुळे तो खोटं बोलत असल्याचं पोलिसांना समजलं.

अखेर घरी परतला…

अखेर २५ नोव्हेंबर रोजी सकाळी जगदीश मुंबईत आला. पोलिसांनी लागलीच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये त्याने ‘आपला कुठल्याही पाकिस्तानी तरुणीशी कधीही संबध आलेला नाही आणि मी हिंदू धर्माचा तिटकारा आला असून मुस्लिम धर्म स्वीकारत आहे असेही कधी बोललो नाही,’ असा खुलासा जगदीशने आपल्या जबाबात केला.

पण मग नक्की जगदीश पळाला का?

पोलिसांनी जगदीशच्या तपासामध्ये त्याच्या पळून जाण्याचं कारण वारंवार खोदून खोदून विचारल्यानंतर जगदीशनं तोंड उघडलं. त्याच्या घरच्यांचं एक चष्म्याचं दुकान आहे. या दुकानात बसण्यासाठी जगदीशचे कुटुंबिय त्याच्यावर सक्ती करत होते. मात्र, जगदीशला तिथे न बसता स्वत:च्या पायावर उभं राहायचं होतं. नोकरी करायची होती. त्यामुळे दुबईतल्या एका एजंटच्या मदतीने त्याने पर्यटन व्हिसा मिळवला. तिथे जाऊन त्याने एका कंपनीमध्ये सफाई सुपरवायजर म्हणून नोकरी देखील मिळवली. पण त्याला नोकरी करण्याचा अधिकृत व्हिसा हवा होता. आणि म्हणून तो मुंबईत परतला होता, अशी माहिती जगदीशने पोलिसांना दिली आहे.


हेही वाचा – जेलमधून पळाला आणि त्याचा खून झाला!

जगदीशला ‘पब्जी’ गेमचं वेड!

जगदीशला पब्जी गेमचं वेड होतं, असंही त्याने कबुली जबाबात सांगितलं आहे. या गेमच्या माध्यमातून अनेक परदेशी तरुणी तरुण संपर्कात तो होता. पण ‘आपल्या देशावर संकट ओढवेल असे कुठलेही कृत्य मी केलेले नाही’, असे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, जगदीशला परत आणण्यासाठी त्याच्या भावाने ‘तो हिंदू धर्माला मानत नाही असं सांगून गेला’ असल्याचा खोटा जबाब दिल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

First Published on: November 26, 2018 8:41 PM
Exit mobile version