पोलीस दलात आपलं कर्तव्य पुर्ण करताना डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं. मात्र आपल्या कर्तव्याकडे डोळेझाक होत असताना राजगुरुनगर येथील पोलीस कोठडीत असणारे दोन आरोपी कस्टडीच्या खिडकीचे गज कापून त्यातून पळ काढण्यात यशस्वी झाले आहेत. उत्तर पुणे जिल्हात चोरी, दरोडे सारखे मोठे गुन्हे तयारीने केले जातात. यामुळे आरोपीही सराईत बनत चालले आहेत. त्यामुळे खाकी वर्दीचा धाक आता सराईत गुन्हेगारांवर राहिला नसल्याचे चित्र यातून दिसत आहे.
समाजात चांगल्या वाईट घटना घडत असताना पोलिस वर्दीचा धाक कायम असणाऱ्या पोलीसांकडूनच आरोपी अगदी सहज पळून जाण्यात यशस्वी होत असल्यामुळे संपूर्ण पोलिस दलाची नाचक्की होत आहे. सर्वसामान्यांना कायद्याचा धाक दाखवून मनमानी कारभार करणारे पोलिस ड्युटीवर झोपतातच कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे. झोपाळू पोलिसांमुळेच आरोपी पळून गेले असल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर आज पहाटेपासून आरोपींना शोधण्याची धावपळ पोलीसांनी सुरु केली आहे.
अशी घडली घटना
कोठडीतून पळालेले आरोपी १) विशाल दत्तात्रय तांदळे (वय २२, रा मंचर ता आंबेगाव जि. पुणे) आणि राहुल देवराम गोयेकर (वय २६, रा. गोयेकरवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) नावे आहेत. पोलीस कोठडीत असताना या दोन्ही आरोपींनी कस्टडीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या खिडकीचे गज कापून या खिडकीतून पलायन केले आहे. यामध्ये या दरोड्यातील आरोपींना त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पळून जाण्यास मदत केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलीस कोठडीतून आरोपी पळून गेल्याने झोपलेल्या पोलीसांची आता झोप उडाली आहे.
दरम्यान झोपाळू पोलिसांच्या या कार्यशैलीमुळे कोठडीत असणारे दोन आरोपी पळून गेल्याने संपूर्ण पोलिस दलाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे.