मुंबईत दिवसाढवळ्या पाच जणांवर चाकू हल्ला; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

मुंबईत दिवसाढवळ्या पाच जणांवर चाकू हल्ला; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

मुंबईः मुंबईतील ग्रॅंटरोड परिसरात दिवसाढवळ्या पाच जणांवर चाकू हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत. जखमींवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत्यूंमध्ये एक ज्येष्ठ नागरिक व महिला असल्याची माहिती आहे. याप्रकरणी चेतन गाला या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

चेतन गालाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यामुळे त्याने हा हल्ला का केला? कोणाच्या सांगण्यावरुन केला? याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र ५४ वर्षीय गालाचे पत्नी सोबत खटके उडायचे. पत्नीला शेजारी भडकवतात, असा गालाला संशय होता. त्यावरुन त्याचे व शेजाऱ्यांचे अनेकदा भांडणही झाले होते. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी चेतनने शेजारी राहणाऱ्या पाच जणांवर चाकू हल्ला केला. चेतन राहत असलेली चाळ रस्त्यालगतच आहे. त्यामुळे हा हल्ला होत असताना रस्त्यावरुन ये-जा करणारे त्याचे चित्रिकरण करत होते. चेतन सपासप वार करत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा हल्ला भीषण होता. परिणामी चेतनला थांबावायला कोणीच पुढे गेले नाही. हल्ला करुन चेतन पळून जात होता. पण पोलिसांनी वेळीच त्याला अटक केली.

हल्ला झालेल्या पाचही जणांना तत्काळ रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वीच दोघांना मृत घोषित करण्यात आले. मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक व एक महिला असल्याची माहिती आहे. अन्य तीनजणांवर उपचार सुरु आहेत.

चेतन पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. शेजाऱ्यांसोबत असलेल्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र गालाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे गालाच्या कृत्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

First Published on: March 24, 2023 7:02 PM
Exit mobile version