राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने लसीकरण मोहिमेचा वेगही वाढण्यात आला आहे. यातच आजपासून ४५ वर्षावरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. मात्र ठरावीक वेळेत लसी दिली जात असल्याने लसीकरण केंद्रावर मोठ्याप्रमाणात गर्दी होत होती. यामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता लसीकरणाची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी मनसेने केली आहे.
याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी ट्विट करत, कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरणाची संख्या आणि व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच ४५ वर्षांवरील नोकरदार नागरिकांना लस घेणे सुलभ करण्यासाठी, लसीकरणाची वेळ वाढवून सकाळी ७ ते रात्री ९ करावी अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी नितीन सरदेसाई यांनी मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहिले आहे.
कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरणाची संख्या आणि व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच ४५ वर्षांवरील नोकरदार नागरिकांना लस घेणे सुलभ करणेसाठी, लसीकरणाची वेळ वाढवून सकाळी ७ ते रात्री ९ करावी ही विनंती.@mybmc pic.twitter.com/L6fs6Y24nI
— Nitin Sardesai (@1nitinsardesai) April 1, 2021
यातच आज पालिकेने वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता लसीकरण मोहिम दोन शिफ्टमध्ये सुरु करण्याचा निर्णय आहे. लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी पालिकेने सकाळी ७ ते २ मध्ये पहिली शिफ्ट तर दुपारी २ ते रात्री ९ अशी दुसरी शिफ्ट लागू केल्या आहे. याआधी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच लसीकरण केले जात होते. मात्र आता दोन शिफ्टमध्ये लसीकरण सुरु झाल्याने अधिकाधिक नागरिकांना लस घेणे सुलभ होणार आहे. त्यामुळे मनसेच्या या मागणीची पालिकेने पूर्ण केली असे म्हणता येईल.