Mumbai Local Trains: रेल्वे प्रवासासाठी आता QR कोड अनिवार्य असणार

Mumbai Local Trains: रेल्वे प्रवासासाठी आता QR कोड अनिवार्य असणार

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी लोकल सेवा सुरु केली आहे. मात्र या प्रवासादरम्यान बनावट ओळखपत्र तयार करुन अनेक प्रवाशी प्रवास करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर आळा घालण्यासाठी गुरुवारपासून १५ रेल्वे स्थानकांवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना QR कोड अनिर्वाय करण्यात येणार आहे. या ठिकाणी मोबाईल App आणि QR कोड स्कॅनिंग मशीनच्यामार्फत प्रवाशांचे ओळखपत्र स्कॅन करून रेल्वे स्थानंकात प्रवेश देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. सध्याच्या घडीला अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची संख्या सुमारे तीन लाख आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर प्रवास करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी लोकलच्या दिवसभरात ७०० फेर्‍या चालविण्यात येतात. या कर्मचार्‍यांना प्रवासाकरिता क्यूआर कोड आधारीत ई-पास देण्यात येत आहे. रेल्वेची क्यूआर कोडची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शासकीय ओळखपत्रावर लोकल प्रवाशांना लोकल सेवेत प्रवेश देण्यात येत होता.

सध्या मध्य रेल्वे मार्गावर ३ लाख ३४ हजार ५०० अत्यावश्यक सेवतील ९५ संस्थांच्या कर्मचार्‍यांची नोंद करण्यात आली आहे. त्यातील १ लाख ८० हजार ४०० जणांचे क्यू आर कोड जनरेट करण्यात आले आहेत. त्यामुळे आता मध्य रेल्वेकडून क्यू आर कोडची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारपासून मध्य रेल्वेच्या १५ रेल्वे स्थानकांवर क्यू आर कोडची तपासणी करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या तपासणीसाठी सीएसएमटी रेल्वे स्थानक अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी क्यू आर कोड स्कॅनिंग मशीन बसविण्यात आली आहे. तर जीआरपी आणि आरपीएफ असे मिळून ४९५ जवांना क्यू आर कोड स्कॅनिंग मोबाईल App देण्यात आले आहे. या मोबाईल App वरून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांचे ओळखपत्र स्कॅन करून पाठवण्यात येईल. तर मध्य रेल्वेने लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठीही तिकीट तपासणीसांना स्कॅनिंग मशीन दिली होती. आता त्याऐवजी स्वयंचलीत स्कॅनिंग क्यू आर कोड मशीन ३ महिन्यांच्या पायलट प्रोजेक्टवर बसविण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी दिली आहेत.

आजपासून २ अतिरिक्त लोकल

केंद्रीय कर्मचार्‍यांना अत्यावश्यक सेवेतील लोकल सेवेतून प्रवास करण्यास मुभा देण्यात आल्यावर प्रवासी संख्या वाढली आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मोठया प्रमाणात प्रवासी संख्या वाढल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी हार्बर मार्गावर शुक्रवारपासून २ अतिरिक्त लोकल सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

First Published on: August 27, 2020 9:37 PM
Exit mobile version