देशभरात आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत देखील कोरोना संसर्गाचा दर कमी झाला आहे. मुंबईकारांसाठी ही जरी दिलासादायक बाब असली तरी मुंबईत कोरोनाचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मुंबईकरांचे सध्या सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी कधी मुभा दिली जाईल याकडे लक्ष लागून राहिले आहे. पण आता मुंबईकरांना अजून लोकल प्रवासासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागणार आहे, याबाबतचे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
मुंबई लोकल संदर्भात विजय वटेड्डीवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. कोरोना संपल्याशिवाय मुंबईची लोकल सुरू होणार नाही, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान जरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी दुसऱ्या बाजूला डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण हळूहळू आढळत आहेत. त्यामुळे तज्ज्ञ कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवत आहे. त्यामुळे राज्य सरकार मुंबई लोकल संदर्भातील निर्णय लांबणीवर टाकताना दिसत आहे. कारण लोकल सुरू झाली की, मुंबईतील गर्दी वाढू शकते. तसेच आजूबाजूच्या एमएमआरसीटीमधील लोकांची गर्दी मुंबईत वाढेल. त्यामुळे राज्य सरकार असो किंवा मुंबई महापालिका हळूहळू लोकल संदर्भात पाऊल उचलत आहेत.
मुंबईच्या लोकलबाबत महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, इतर शहरातून मुंबईत येणारा लोंढा जास्त आहे. इतर शहरापेक्षा आपली मुंबई दाटीवाटीची आहे. धारावीसारख्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीत कोरोना रुग्णसंख्या शून्य केली आहे. त्यामुळे थोड्या शांततेने, संयमाने, हळूवारपणे लोकलचा निर्णय घेऊ, असं महापालिकेने कळवलं आहे.
हेही वाचा – Mumbai corona update : मुंबईत गेल्या २४ तासात ७३३ कोरोनाबाधितांची नोंद, मृत्यूच्या आकड्यात चढउतार