‘मी पुन्हा येईन’ हा चेष्टेचा विषय, शरद पवार यांचा फडणवीसांना टोला

‘मी पुन्हा येईन’ हा चेष्टेचा विषय, शरद पवार यांचा फडणवीसांना टोला

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हे वाक्य विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. या वाक्यावरून अनेक विनोद देखील तयार झाले. मात्र आता याचा वाक्याचा आधार घेत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला असून, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाल्याचे पवार म्हणालेत. सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘राजकीय नेत्याने जनतेला गृहीत धरू नये. भाजपचे ‘आता आम्हीच’ हे लोकांना आवडले नाही. कुठल्याही लोकशाहीतला नेता आपण अमरपट्टा घेऊन आलोय असा विचार करू शकत नाही. या देशातल्या मतदारांना गृहीत धरले तर तो कधी सहन करत नाही. इंदिरा गांधींसारख्या जनमानसात प्रचंड पाठिंबा असणाऱ्या व्यक्तीलासुद्धा पराभव पाहावा लागला होता. अटलबिहारी वाजपेयींसारख्या नेत्यालासुद्धा पराभव पाहायला मिळाला. याचा अर्थ असा आहे की, या देशातला सामान्य माणूस लोकशाहीच्या अधिकाऱ्याच्या संदर्भात आम्हा राजकारणातल्या लोकांपेक्षा अधिक शहाणा आहे आणि आमचे पाऊल चाकोरीच्या बाहेर टाकतोय असे दिसले की तो आम्हालाही धडा शिकवतो. त्यामुळे कोणतीही भूमिका घेऊन बसलो की, आम्हीच येणार तर लोकांना ते आवडत नाही’, असे म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.


हेही वाचा – मी या सरकारचा ना हेडमास्तर ना रिमोट कंट्रोल – शरद पवार


 

First Published on: July 11, 2020 10:11 AM
Exit mobile version