पंजाब महाराष्ट्र बँकेचे महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येनं खातेदार आहेत. मात्र, या सगळ्या खातेदारांठी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देशाची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे बँकेच्या खातेदारांना दिवसाला फक्त एक हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. बँकेच्या अनेक ठेवीदारांनी कर्ज घेऊन ती परत न केल्यामुळे बँकेवर आर्थिक संकट ओढवलं आणि त्यामुळेच बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात मंगळवारी सकाळी पीएमसी बँकच बंद झाल्याच्या अफवा उठल्या होत्या. मात्र, तसं काहीही नसल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं. असं असलं, तरी दिवसाला फक्त १ हजार रुपयांचंच बंधन टाकण्यात आल्यामुळे खातेदारांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी बँकेकडून सर्व खातेदारांना मोबाईलवर मेसेज पाठवून पीएमसीवरच्या निर्बंधासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यासोबतच, बँकेकडून आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचे प्रयत्न केले जात असून येत्या ६ महिन्यात त्यावर उपाय योजण्यात येतील असं देखील आश्वासन बँकेचे एम.डी. श्री. जॉय थॉमस यांनी दिलं आहे.
पीएमसी बँकेवर बी. आर. च्या कलम ३५ ए अंतर्गत येत्या ६ महिन्यांसाठी आर्थिक बंधनं टाकण्यात आली आहेत. बँकेच्या आर्थिक अनियमिततेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल आम्हाला खेद आहे. बँकेचा एम. डी. म्हणून मी या सगळ्याची जबाबदारी घेतो आणि सर्व ठेवीदारांना हमी देतो की ६ महिन्यांच्या मुदतीपूर्वी ही परिस्थिती सुधारली जाईल. ही बंधनं काढली जावीत यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. मला माहीत आहे की आपणा सर्वांसाठी ही एक अवघड वेळ आहे आणि कोणत्याही दिलगिरीने तुमचा मनस्ताप भरून निघणार नाही. कृपया सहकार्य करा. आम्हाला खात्री आहे की आम्ही या परिस्थितीवर नक्कीच मात करू आणि खंबीरपणे उभे राहू.
जॉय थॉमस, एमडी, पीएमसी बँक