राम शिंदे यांचे वक्तव्य हीच सरकारची खरी मानसिकता – मुंडे

राम शिंदे यांचे वक्तव्य हीच सरकारची खरी मानसिकता – मुंडे

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

“मंत्री राम शिंदे यांचे शेतकरी विरोधी वक्तव्य हीच सरकारची खरी मानसिकता आहे. उशिरा आलेल्या केंद्रीय पथकाचे दुष्काळी पाहणी दौरे म्हणजे केवळ फार्सच नाहीतर जनतेच्या जखमांवर मिठ चोळायचे प्रकार आहे” असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. धुळे येथे निवडणूक प्रचारासाठी जात असताना रस्त्यात शिर्डी येथे माध्यमंकर्मींशी मुंडेंनी संवाद साधला. यावेळी सरकारवर त्यांनी चौफेर टीकेची झोड उठवली. केंद्रीय पथक सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते निव्वळ औपचारिकता पूर्ण करत असल्याचे मुंडे म्हणाले.

केंद्रीय पथक एका गावांत अक्षरशः दोन अन् तीन मिनिटे जर थांबत असेल आणि रात्रीच्या अंधारात शेतांना भेटी देत असेल तर प्रशासन आणि सरकार दुष्काळाविषयी किती गंभीर आहे? हे कळून येते, असा सवाल धनंजय मुंडेंनी यावेळी उपस्थित केला.

छावण्या नसतील तर जनावरे पाहुण्यांकडे पाठवा – राम शिंदे

दुष्काळात जनतेला धीर देऊन मदत करण्याऐवजी “चारा नसेल तर जनावरं पाहुण्यांकडे किंवा शेजारी पाठवा” असे वक्तव्य जर राम शिंदे यांच्यासारखे मंत्री करत असतील तर खरंच हे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि या सरकारची जनतेप्रति किती संवेदना आहे हे दाखवून देण्यासाठी पुरेसे आहे असे म्हणत मुंडेंनी शिंदे यांना त्यांच्या बेताल वक्तव्याचा समाचार घेतला. राज्यापुढे अनेक मोठेमोठे प्रश्न आ वासून ऊभे असताना या सरकारमधील जेष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील जर भीमा-कोरेगांव प्रकरणातील संदिग्ध आरोपी मनोहर भिडे यांना भेटण्यात आपला वेळ खर्ची घालत असतील तर या सरकारची प्राथमिकता कशाला आहे हे स्पष्ट होते, अनेक प्रकरणात दोषी असूनही त्यांना क्लीन चिट मिळते याचाच अर्थ तेच सरकार चालवत आहेत, असेही मुंडे यावेळी म्हणाले.

First Published on: December 6, 2018 6:22 PM
Exit mobile version