बालक वाहून गेल्याप्रकरणी गुन्हा नोंदवा- नवाब मलिक

बालक वाहून गेल्याप्रकरणी गुन्हा नोंदवा- नवाब मलिक

गोरेगाव  येथील गटारावरील उघड्या झाकणामुळे चिमुरडयाचा मृत्यू झाला असून  याप्रकरणी संबंधितावर ३०४ अन्वये गुन्हा दाखल करुन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.  गोरेगावमध्ये गटारावरील उघड्या झाकणामुळे त्यामध्ये पडून एका मुलाचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना आहे. याअगोदर अनेक लोकांचे गटारात पडून मृत्यू झाले आहेत आणि या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांच्या मृत्यूची जबाबदारी अद्याप कुणावर ठेवण्यात आलेली नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

महापालिकेने गटारावरील प्लास्टिकची झाकणं खरेदी केली ती पावसाच्या पाण्यात वाहून जात आहेत. या घटना पालिकेच्या हलगर्जीपणामुळे घडत आहेत असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान वारंवार घडणाऱ्या या घटनांची जबाबदारी सरकारने निश्चित करावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

मुंबई उपनगरातील गोरेगाव पूर्वे कडील आंबेडकर चौक या भागातील चाळीत राहणारा दिव्यांश तिकडच्या नाल्यात पडला. ही घटना बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. रात्रीच्या वेळी दिव्यांश घरातून बाहेर रस्त्यावर येत असताना तो उघड्या असलेल्या नाल्यात पडला आणि वाहून गेला.

First Published on: July 11, 2019 12:27 PM
Exit mobile version