मुंबई: मुंबईसह महाराष्ट्राची कायद व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, सरकार महायुतीच्या चिल्लर नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात व्यस्त आहे. सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार हा भाजपा सरकारची पोलखोल आहे, असं टीकास्त्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपासह राज्यातील महायुती सरकारवर डागलं आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घरावर गोळीबार झाला आहे. यासंदर्भात आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. (Sanjay Raut Criticized BJP And Mahayuti Government on Salman Khan Firing Case)
गल्लीतल्या माणसाला सुरक्षा (Raut on Salman Khan Firing)
सलमान खान हे सिने जगतातलं मोठं नाव आहे. एकूणच मुंबईसह महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचं संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार आमदार, खासदार आणि शिवसेना राष्ट्रवादीतून पक्ष सोडून गेलेले आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत.
गल्लीतला एखादा माणून पक्ष सोडून मिंदे गटात किंवा अजित पवार गटात जात आहे त्याला सुरक्षा पुरवली जातेय. भाजपाच्या सर्व चिल्लर कार्यकर्त्यांनासुद्धा पोलीस संरक्षण, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या चिल्लर कार्यकर्त्यांला प्रचंड पोलीस संरक्षण आहे आणि सामान्य जनता मात्र वाऱ्यावर आहे, असं राऊत म्हणाले.
गृहखातं आणि आयुक्त करतायत तरी काय?
राऊत म्हणाले की, सलमान खान संदर्भात झालेली फायरिंग हा इशारा नाही, तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भाजपा पक्ष आणि यांचं सरकार यांची पोलखोल झाली आहे. गृहमंत्री राजकारणात अडकले आहेत. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, मात्र त्यांचं काम सध्य विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं, त्यांच्यामागे यंत्रणा लावणं आहे.
गृहमंत्री राजकारणात व्यस्त आहेत, पण पोलीस आयुक्त काय करतायत, पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाही ना, त्यांचा मुंबईवर लक्ष आहे की नाही, की ते सुद्धा भाजपाच्या गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या पालख्या वाहत आहेत. मुंबईच्या लोकल ट्रेन, मुंबईचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणं सर्वत्र हीच परिस्थिती आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
(हेही वाचा: Salman Khan: सलमान खान गोळीबारप्रकरणी फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…)