कभी कभी लगता है, अपुनही भगवान है

कभी कभी लगता है, अपुनही भगवान है

खासदार संजय राऊत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेली आहेत. भाजपकडून तर आता शिवसेना एनडीएतून बाहेर पडली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर बरसले आहेत. ‘भाजप नेते स्वत:ला भगवान समजत आहेत. त्यामुळेच आपण काहीही करु शकतो असे त्यांना वाटते. कभी कभी अपुनही भगवान है असा त्यांचा समज आहे. मात्र, या देशात मोठ-मोठे बादशाह येऊन गेले, पण लोकशाही कायम आहे. त्यामुळे भाजप नेत्यांचा हा समज चुकीचा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे’, असे संजय राऊत संसदेत म्हटले आहे.

आजपासून दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी दिवंगत भाजप नेते अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर जेटली यांच्या निधनाने देशाची फार मोठी हानी झाल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर संसदेत त्यांनी भाजप नेत्यांवर चांगलाच निशाना साधला. शिवसेना खरेच एनडीएतून बाहेर पडली आहे का? अजूनही निश्चित असे काही सांगता येणार नाही. कारण, संजय राऊत यांनी एनडीएतून बाहेर पडण्याच्या मुद्द्यावरुन देखील भाजपवर टीका केली. एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी कुणाच्याही मालकीची संपत्ती नाही. त्यामुळे आम्हाला न विचारात घेता, शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढलेच कसे? असा सवाल राऊत यांनी केला. शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका बजवणार असली तरी, अजूनही काँग्रेसप्रणीत यूपीएमध्ये सामील झालेली नाही.याशिवाय शिवसेना यूपीएमध्ये सामील होणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.आज संसदेचा पहिल्या दिवशीच शिवसेनेच्या खासदारांनी संसदेत आक्रमक पवित्रा घेतला. महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस आणि शेतकर्‍यांना केंद्र सरकारकडून देण्यात आलेली तुटपुंजी मदत यावरुन त्यांनी सभागृहामध्ये केंद्र सरकारवर टीका केली.

First Published on: November 19, 2019 4:23 AM
Exit mobile version