७० ते ८० कोटी रुपयांची खोटी बिले कंत्राटदारांना

७० ते ८० कोटी रुपयांची खोटी बिले कंत्राटदारांना

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप

राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागात घोटाळा केला. 70 ते 80 कोटी रुपयांची खोटी बिले कंत्राटदारांना देण्यात आली, असा थेट आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी केला. भातखळकरांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

अतुल भातखळकर म्हणाले की, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात घोटाळा झाला आहे. खोटी बिले दाखवण्यात आली. राज्य सरकारने बांधकाम विभागात घोटाळा केला. 70 ते 80 कोटी रुपयांची खोटी बिले कंत्राटदारांना देण्यात आली. 2010 ते 30 नोव्हेंबर 2020 पर्यंतची ही बिले आहेत. दोन ते तीन महिन्यात सर्व नियम धाब्यावर बसवत, सगळी बिले पास केली. या बिलांचे पेमेंट खोटे आहे. ही बिले पास झाली नव्हती, आता पास कशी झाली? याची चौकशी करायला हवी. ज्या अधिकार्‍यांनी हा घोटाळा केला, त्यांच्यावर कारवाई करा. अन्यथा 15 दिवसांत कोर्टात जाणार, असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

एकट्या मुंबईतून 70 कोटींची बिलेपास झाली. या घोटाळ्याचे धागेदोरे नांदेडपर्यंत आहेत, असे म्हणत भातखळकरांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. कोरोना काळात पैसे नव्हते तर मग बिले पास कशी केली? ही बिले मंत्र्यांच्या बंगल्यांची, मंत्रालयातील कामांची, सरकारी कामांची बिले. मुळात ही बिले खोटी आहेत. ३५ टक्के कमिशनने ही बिले ठाकरे सरकारने पास केली, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला.

सामनावर हल्लाबोल
जे जगाला चारित्र्य शिकवतात त्यांच्याकडून ज्या भाषेचा वापर होतोय, हे चुकीचे आहे. ‘सामना’च्या संपादक या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे ही भाषा शोभणारी नाही. हायकोर्टाने चपराक लगावलीय तरी यांना कळत नाही, असे भातखळकर म्हणाले.

मेहबुब शेख प्रकरणावरुन राष्ट्रवादीवर निशाणा
राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस तोंड उघडत नाही. महिलांच्या अत्याचारावर खासदार सुप्रिया सुळे इतर नेते मोर्चे काढतात आणि इथे मात्र तोंड बंद होते. हा निर्लज्जपणाचा कळस आहे.

First Published on: January 2, 2021 7:03 AM
Exit mobile version