अकरावीचा अर्ज भरण्यातील अडचणीमुळे विद्यार्थ्यांचा संताप

अकरावीचा अर्ज भरण्यातील अडचणीमुळे विद्यार्थ्यांचा संताप

अकरावी प्रवेशासाठीची CET परीक्षा हायकोर्टाने रद्द केल्याने, आता अकरावी प्रवेश प्रक्रिया होणार केंद्रीय पद्धतीने

दहावीच्या परीक्षेच्या निकाल घसरल्याने काही दिवसांपासून रखडलेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 19 जूनपासून सुरुवात झाली. प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाल्याने विद्यार्थी व पालकांनी संकेतस्थळावर दुसर्‍या टप्प्यातील अर्ज भरण्यास सुरुवात केली. पण अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेली कॉलेजांची यादी व कट ऑफ लिस्टच शिक्षण विभागाकडून संकेतस्थळावर अपलोड केेलेली नाही. अर्ज भरण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या बाबीच उपलब्ध नसल्याने अर्ज भरताच येत नसल्याने विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दहावी परीक्षेचा निकाल कमालीचा घटल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रवेशाचा पेच निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत शिक्षण विभागाने 19 जूनपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांनी दुसर्‍या टप्प्यातील ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात केली. ऑनलाईन अर्ज भरताना गतवर्षीची कट ऑफ व कॉलेजांची यादी पाहून विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे व जवळचे कॉलेज निवडता येते. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांनी आपल्या जवळचे कॉलेज व त्याची कट ऑफ पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट दिली. परंतु संकेतस्थळावर शिक्षण विभागाकडून कोणतीच माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांसमोर अर्ज कसा भरायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संकेतस्थळावर कट ऑफ व कॉलेजांची यादी नसल्याने विद्यार्थी व पालकांनी बुधवारी मुंबई उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना आमच्याकडेही कॉलेजांची यादी व कट ऑफची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमधील संभ्रम अधिकच वाढला आहे. निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात विलंब लावण्यानंतर कट ऑफ व कॉलेजांची यादी संकेतस्थळावर तर नाहीच परंतु संचालक कार्यालयाकडे नसल्याने विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

दहावी परीक्षेचा निकाल कमालीचा घटल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रवेशाचा पेच निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करत असले तरी शिक्षण उपसंचालक कार्यालय मात्र मुंबई महानगर प्रदेशातील प्रवेशाबाबत कमालीचे उदासीन असल्याचे दिसत आहे. काही महाविद्यालयांना प्रवेशाचे लॉगइन मंगळवारी (ता.18) देण्यात आल्याने त्यांच्याकडूनही तक्रारी सुरू आहेत. यातच गेल्या वर्षीचे महाविद्यालयांचे कट ऑफ पाहून पालक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा निर्णय घेत असतात. परंतू उपसंचालकांच्या हलगर्जीपणामुळे अद्यापही पालकांना हे कट ऑफ उपलब्ध होउ शकलेले नाहीत. हे कट ऑफ पुढील दोन दिवसात विद्यार्थ्यांना मिळतील, असे प्रभारी उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्याकडून सांगण्यात आले.

उपसंचालक कार्यालयाकडे नव्याने मंजूरी देण्यात आलेल्या महाविद्यालयांतील जागांचा तपशीलही उपलब्ध नाही. शिक्षण मंत्री अशिष शेलार यांनी महाविद्यालयातील जागा वाढविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरही मुंबई विभागाकडे कोणत्या महाविद्यालयात किती जागा वाढणार याची माहिती नसल्याने यंदा प्रवेशाचा बोजवारा उडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीकडून माहिती घेउन कळविण्यात येईल, असे आश्वासन अहिरे यांच्याकडून देण्यात आले. परंतू बुधवारी रात्रीपर्यंत अकरावीसाठी किती विद्यार्थ्यांचे अर्ज आले, यासह विविध माहिती प्राप्त होउ शकली नाही. यामुळे प्रभारी उपसंचालकांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले कट ऑफ व कॉलेजांची यादी दोन दिवसांत विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. – राजेंद्र अहिरे, प्रभारी शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग 

First Published on: June 20, 2019 4:44 AM
Exit mobile version