मागील महिन्यात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडला. यामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सामान्य नागरिकांपासून लहान-मोठ्या व्यावसायिकांचेसुद्धा प्रचंड नुकसान झाले. उल्हासनगरमधील गणपतीच्या मूर्ती तयार करणाऱ्या कारखानदारांनासुद्धा मुसळधार पावसाचा फटका सहन करावा लागत आहे. गणपतीच्या आगमनाला केवळ १२ दिवस उरलेले असताना कमी कालावधीत मूर्ती तयार करण्यासाठी येथील कारखानदारांची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. मूर्ती वेळेत तयार होण्यासाठी मूर्तिकार रात्रं-दिवस मेहनत घेत आहेत.
गणेश मुर्ती बनविण्याचे काम रखडले
यावेळी सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हासनगरमधील काही कारखान्यांमधील गणेश मूर्ती बनविण्याचे काम रखडले. गणरायाच्या अगमनाला अवघे १२ दिवस उरले आहेत. त्यामुळे मूर्ती तयार करणाऱ्या कारखानदारांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. उल्हासनगरातील कॅम्प नं.४ येथील स्टेशनरोड मद्राशीपाडा परिसरात ज्योती कला वैभव हा गणपतीचा कारखाना आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षापासून या कारखान्यात गणरायाची मूर्ती तयार करण्यात येतात. या कारखान्यात दरवर्षी मधुकर नागावकर व अविनाश नागावकर हे आपल्या सहकाऱ्यांसह गणेश मूर्ती तयार करतात. या कारखान्यातून राज्यातील कानाकोपऱ्यात गणपतीच्या मूर्तिची विक्री केली जाते.
१२ फुटापासून ते दीड फुटापर्यंतच्या सुबक गणेश मूर्ती या कारखान्यात तयार केल्या जातात. पण यावेळी शाडू मातीच्या व कागदांच्या लगद्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या गणेश मूर्तिंना अधिक मागणी आहे. पण यावेळी मुसळधार पावसामुळे मूर्तिचे काम अद्यापही सुरू आहे. गणपतीच्या आगमनाला १२ दिवस उरले असून आता गेल्या दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कारखान्यात रात्रं-दिवस मूर्ती बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे. पण मूर्ती सुकायला अजून काही कालावधी लागेल. त्यानंतर रंग देण्याचे काम वेगाने करावे लागेल.
मधुकर नागावकर, मूर्तिकार