महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध सामाजिक संस्था–संघटना पुढे सरसावल्या असताना आता चिंचपोकळीच्या चिंतामणी ग्रुप देखील मदतीसाठी एक पाऊल उचलले आहे. सांगली येथील वाळवा तालुक्यामधील गावातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिंचपोकळीच्या चिंतामणी ग्रुपने धाव घेतली आहे. चिंचपोकळी येथील कल्पेश शाह यांच्या नेतृत्वाखाली गौरी शाह, गणेश मोहिते, गिरीश परब, शरद फराटे, विनायक तोरसकर यांच्यासह पस्तीस जणांच्या टीमने १ हजार २०० जीवनावश्यक वस्तूंच्या पाकीटांचे घरोघरी जाऊन वितरण करून पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
महिलांसाठी सॅनिटरी पॅडचे वाटप
सांगली येथील वाळवा तालुक्यामधील शिरगाव, हवालदार नगर, शिंदे वस्ती, संतगाव आणि सूर्यगाव या गावातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी महिला कार्यकर्त्यांकडून ५०० स्थानिक महिलांसाठी सॅनिटरी पॅड आणि फिनाईलचे वाटप देखील करण्यात आले आहे. या सामाजिक उपक्रमासाठी विभागीय रहिवाशी सचिन पाटील यांनी मोफत बस उपलब्ध करून आपला खारीचा वाटा उचलला आहे. तसेच १२०० जीवनावश्यक वस्तूंच्या पाकीटासाठी जवळपास साडेतीन लाख रुपयांचा निधी जमवून त्यांना मदत केली आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
हेही वाचा – काळाचौकी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत