पावसाळ्यात ठाण्यातील ८४ गावांना पुराचा धोका

पावसाळ्यात ठाण्यातील ८४ गावांना पुराचा धोका

पूरपरिस्थिती क्षेत्र (प्रातिनिधिक फोटो)

२६ ठिकाणी दरड कोसळण्याची भीती

ठाणे जिल्ह्यातील ३० टक्के भागात पूर येण्याची शक्यता आहे. तसेच भातसा आणि उल्हास नदीजवळील ८४ गावांना यंदाच्या पावसात पुराचा धोका असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर ठाणे शहरात १४ ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता आणि २६ ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने व्यक्त केली आहे. पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीच्या नियोजनासंबंधी स्थितीचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची बैठक नुकतीच झाली, यावेळी ही माहिती देण्यात आली.

ठाणे जिल्ह्यातील परिस्थिती

ठाणे जिल्ह्यात दरवर्षी सरासरी दोन हजार ५६७ मिली पावसाची नोंद होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केल्यानुसार पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेली ५१ गावे ही भातसा धरणाला लागून आहेत. यापैकी शहापूर तालुक्यातील १७ गावांचा समावेश आहे. पूर आल्यानंतर धरणाजवळ असलेल्या गावांचा संपर्क तुटत असल्याने पाटबंधारे विभागाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्यात नेहमीच ठाणे जिल्ह्यातील गावांमध्ये पूरपरिस्थिती येत असते. त्यावर दरवर्षी केवळ पाऊस येण्यापूर्वी चर्चा केल्या जातात. मात्र, त्यावर कोणतीही पावले उचलण्यात येत नाहीत. यावर्षी त्यावर आधी उपाययोजना आखण्यात याव्या.

आपत्ती व्यवस्थापनाला द्यावी सूचना

पावसामुळे धरणाचे पाणी सोडण्याची वेळ आल्यास आधी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सूचित करावे, अशा सूचना या विभागाला देण्यात आल्या आहेत. याशिवाय धरणाच्या रोजच्या पातळीची माहिती घेतली जाणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

First Published on: May 30, 2018 8:07 AM
Exit mobile version