मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदानप्रक्रिया पार पडली असून, तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबस कसली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात लढाई असून वंचित बहुजन आघाडीही निवडणुकीच्या रिंगणात आहे. वंचितकडून आतापर्यंत राज्याचील 48 पैकी 39 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, एकिकडे उमेदवार घोषित केल्यानंतर उमेदवार बदलण्याची नामुष्की वंचित बहुजन आघाडीवर ओढावली आहे. नुकताच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून नव्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, सोनल गोंदाणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (vanchit bahujan aghadi disgrace continues now its time to announce the replacement candidate)
लोकसभेच्या उत्तर मुंबई मतदारसंघातून उत्तर भारतीय चेहरा देण्याचा प्रयत्न वंचितकडून होता. त्यानुसार या मतदारसंघात बिना सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, उमेदवाराने माघार घेतल्याने उमेदवारी बदलाची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली. त्यानंतर आज (29 एप्रिल) नव्याने सोनल गोंदाणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे दिलेली उमेदवारी रद्द करणे किंवा उमेदवारी बदलण्याचा वंचित बहुजन आघाडीचा खेळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 जागांपैकी जवळपास 39 मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, चार जागांवरील उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला आहे. कोल्हापुरातून शाहू महाराजांना वंचितने पाठिंबा दिला आहे तर, नागपुरात विकास ठाकरेंना पाठिंबा देण्यात आला. बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारांनी घेतलेली माघार आणि बदललेल्या उमेदवारांची संख्या जवळपास दुहेरी आकड्यात गेली आहे. दरम्यान, लोकसभेचे दोन टप्पे पार होऊन तिसऱ्या टप्प्याचे मतदान राज्यांमध्ये आले, तरी उमेदवारी बदलाचा सिलसिला सुरूच ठेवण्याची नामुष्की वंचित बहुजन आघाडीवर आली आहे.
- वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातूनही उमेदवार बदलण्यात आला आहे. त्यानुसार, संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी दिली आहे.
- मुंबई ईशान्यमधून दौलत कादर खान यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
- अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांनी अर्ज दाखल केला. मात्र, वंचितकडून प्राजक्ता पिल्लेवान यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे ऐनवेळी फॉर्म न भरता वंचितकडून आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देण्याची घोषणा केली.
- रामटेकमधून शंकर चहांदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, किशोर गजभिये यांना ऐनवेळी पाठिंबा दिल्याने वंचितनं आपला उमेदवार माघार घेतला होता.
- यवतमाळमध्ये तब्येतीच्या कारणामुळे सुभाष खेमसिंग पवार यांनी माघार घेतल्यानंतर अभिजित राठोड यांनी वंचितकडून अर्ज दाखल केला. मात्र, अर्जच बाद झाल्याने अपक्ष अनिल राठोड यांना उमेदवारी देण्यात आली.
हेही वाचा – NARENDRA MODI RALLY IN PUNE : एका भटकत्या आत्म्यामुळे महाराष्ट्र अस्थिर, मोदींची घणाघाती टीका
Edited By – Vaibhav Patil