उल्हासनगरमधील भटक्या कुत्र्यांसह मांजरांना ‘पॉज’ने केलं रेबिजमुक्त

उल्हासनगरमधील भटक्या कुत्र्यांसह मांजरांना ‘पॉज’ने केलं रेबिजमुक्त

उल्हासनगरमधील भटक्या कुत्र्यां-मांजरांना 'पॉज'ने रेबिजमुक्त केले.

उल्हासनगर महापालिका भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे दरदिवशी किमान ४ ते ५ जणांना भटक्या कुत्र्याच्या हल्ल्याला सामोरे जावे लागत आहे. मात्र महापालिका या बाबीकडे गांभीर्याने पाहत नसल्याने डोंबिवलीच्या ‘पॉज’ संस्थेने पुढाकार घेऊन रविवारी संस्थेच्या प्रशिक्षित कार्यकर्ते आणि पशु वैद्यकीय विद्यार्थ्यांनी उल्हासनगर पश्चिमेकडे जवळपास २०० च्यावर भटक्या कुत्र्यांसह मांजरांना रेबीज प्रतिबंधक लस टोचली.

उल्हासनगरमधील या भागांमध्ये लसीकरण मोहीम

काही महिन्यापूर्वीच एका भटक्या कुत्र्याने १६ जणांचा चावा घेतल्यानंतरही उल्हासनगर महानगरपालिकेला जाग आलेली नाही. महापालिकेकडे श्वान नसबंदीसाठी कोणतीही उपाययोजना नाही. जागतिक आरोग्य संघटेनेने सांगितल्याप्रमाणे भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आवश्यक आहे आणि त्यांना रेबीज प्रतिबंधक लस दरवर्षी देणे जरुरी आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या ‘पॉज’करांनी उल्हासनगरमधील भटक्या कुत्र्यांसह मांजरांना रेबिजमुक्त केले. रविवारी संस्थेचे प्रशिक्षित कार्यकर्ते आणि पशु वैद्यकीय विद्यार्थ्यांनी उल्हासनगर पश्चिमेकडे जवळपास २०० च्यावर भटक्या कुत्र्यांसह मांजरांना रेबीज प्रतिबंधक लस टोचली. यासाठी १६ जणांच्या टीमने भाग घेऊन गोल मैदान, शांतीनगर भागात फिरून लसीकरण केले.

हेही वाचा – ठाण्यात 20 ते 22 डिसेंबरला मिसळ महोत्सव

‘या’ प्राण्यांना रेबिज होतो

यावेळी ‘पॉज’ संस्थेचे निलेश भणगे यांनी नागरिकांना नसबंदी, रेबीज संदर्भात उपयुक्त माहिती दिली. ते म्हणाले की, “रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी विशेषतः कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होणारा रोग आहे. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसांत दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात. त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात. त्यामुळे त्यांना हा रोग होतो. अशी रेबीज झालेली कुत्री माणसाला चावल्यास माणसांना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो. रेबीजमध्ये प्राणी अस्वस्थ आणि बेचैन होतो. आवाज आणि उजेडाचा त्याच्यावर लवकर प्रभाव पडतो. तो तहान-भूक सर्व विसरून जातो व कोणतीही वस्तू चावण्याचा प्रयत्न करतो. या रोगात प्राण्याची खूप लाळ गळते. त्याचे डोळे भयानक दिसतात. त्याला पाण्याची भीती वाटते. त्याला ताप येतो व तो कश्याही उड्या मारू लागतो. या प्रकारात प्राण्याला कधीकधी लकवा येतो व मानेचे स्नायू कडक होतात. प्राणी त्याचे शेपूट मागील दोन पायात घालून चालतो. रेबीज हा रोग कोणत्याही उष्ण रक्ताच्या प्राण्याला होऊ शकतो. उदाहरण द्यायचे झाल्यास माणूस या रोगाचे लक्ष्य होऊ शकतो.”

First Published on: December 17, 2019 7:19 PM
Exit mobile version