माथाडी कामगार चळवळीची दिशा वाईट अवस्थेत – नरेंद्र पाटील

माथाडी कामगार चळवळीची दिशा वाईट अवस्थेत – नरेंद्र पाटील

नवी मुंबई: सध्या माथाडी कामगार चळवळीची दिशा वाईट अवस्थेत आहे याचे मलाही खंत वाटते, मी ही कुठेतरी कमी पडतोय असे मला वाटते, आजपर्यंतच्या सरकारकडून माथाडी कामगारांच हित कुठे जल गेलं, आणि म्हणूनच यावेळच्या स्व. आमदार अण्णासाहेबांच्या ४१ व्या पुण्यतिथीच्या सभेला एकाही लोक प्रतिनिधीला बोलावण्याची इच्छा झाली नाही. सध्या माथाडी कामगारांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. बोर्ड उदध्वस्त होत आहेत. बोर्डामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. बाजार समितीचे काम अन्यत्र हलविले जाते पण सरकारला याची तमा नाही. आतापर्यंत बहुतेक कामगार मंत्री हे उदयोगपतीच होते आणि आताचेही आहेत मग कामगारांना न्याय कसा मिळणार अशी खंत संघटनेचे सरचिटणीस आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. ते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त माथाडी भवन, नवीमुंबई येथील माथाडी कामगारांच्या भव्य सभेमध्ये बोलत होते. पुढे ते असेही म्हणाले की, अण्णासाहेबांनी केलेल्या ऐतिहासिक माथाडी कायद्याचे उदाहरण सभागृहात कामगारांसंदर्भात कोणताही कायदा पास करताना दिले जाते हेच खरे अण्णासाहेबांच्या अभेद्य चळवळीचे यश आहे. म्हणूनच आपण सर्वांनी संघटित होवून माथाडी कामगार चळवळीसमोर आता जी ज्वलंत आव्हाने उभी आहेत ती नष्ट करण्यासाठी आपल्या संघटनेची ताकद अधिक बळकट करण्याची गरज आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघटने जनसंपर्क अधिकारी व संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्ष, एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, दिलीप खोंड, संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अॅङ भारतीताई पाटील, पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, सेक्रेटरी मनोज जामसुतकर, व्यापारी प्रतिनिधी मयूरभाई सोनी, राजपुरे मा. नगरसेवीका शुभांगी पाटील, शशिकला पाटील, बीडचे रवि शिंदे आदि मान्यवर व माथाडी कामगार कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

अभेद्य एकजूट कायम राहिली पाहीजे

कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, माथाडी कामगार चळवळ अत्यंत वाईट दिशेने आणि रस्त्याने वाटचाल करीत आहे त्यासाठी ती बदलण्याकरीता आपण सगळयांनी एकजुटीने प्रयत्न करायला पाहिजेत. अण्णासाहेबांच्या ऐतिहासीक चळवळीचे अस्तित्व टिकवायचे असेल तर आपली अभेद्य एकजूट कायम राहिली पाहीजे असेही आव्हान त्यांनी उपस्थित कामगारांना केले. ते पुढे असे म्हणाले की, १९८२ साली महाराष्ट्रात अण्णासाहेबांच्या चळवळीचे मोठे वादळ निर्माण झाले. अनेक समाज्याच्या नेत्यांनी संघटना उभ्या केल्या मात्र अण्णासाहेबांनी मराठा समाजाची संघटना उभी करुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात क्रांती घडविली त्याचे पडसाद ग्रामीण भागात मोठया प्रमाणात पसरले.

First Published on: March 24, 2023 9:14 PM
Exit mobile version