वाशीतील जलकुंभ भूमीपूजनावरून राजकारण पेटले

वाशीतील जलकुंभ भूमीपूजनावरून राजकारण पेटले

नवी मुंबई मनपाची कार्यकारणी बरखास्त असून पालिका प्रशासन आणि संबंधित अधिकारी उपस्थित नसताना, पालिकेचा कोणताही कार्यक्रम नियोजित नसताना माजी नगरसेवक वैभव गायकवाड आणि माजी नगरसेविका विद्या गायकवाड यांना जलकुंभाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम घेण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न तेथील स्थानिक रहिवाशी असलेले अ‍ॅड निलेश भोजणे यांनी केला. शनिवारी वाशी येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

वाशी सेक्टर 6 येथील सदर जलकुंभ धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आला आहे. महापालिकेने जलकुंभ बांधण्याचे टेंडर काढले आहे, मात्र, या कामाची वर्क ऑर्डर अध्याप काढलेली नाही,किंवा त्याची माहिती कामाच्या ठिकाणी लावलेली नाही. स्थानिक नागरिकांना धोकादायक जलकुंभाचा धोका आहे. मात्र, नागरिकांना देखील याबाबत कल्पना नसल्याचे अ‍ॅड निलेश भोजणे यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. आम्ही स्थानिक नागरिक म्हणून विचारणा केली असता आमच्यावर वाशी पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी देऊन स्थानिक नगरसेवक नाहक बदनामी करीत असल्याचा आरोप निलेश भोजणे यांनी केला आहे. नवी मनपाची कार्यकारणी बरखास्त असून देखील कामाचे भूमीपूजन माजी नगरसेवकाने कसे केले, याबाबत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे तक्रार दिल्याचे निलेश भोजणे यांनी नमूद केले.

निलेश भोजणे हे भाजप समर्थक असून नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते राजकारण करीत असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. हा जलकुंभ हा दोन वर्षांपूर्वी धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला असून नवीन बांधकामासाठी 29 डिसेंबरला वर्क ऑर्डर निघाली आहे. अनेक प्रभागात नवीन भूमीपूजनाची कामे सुरू असल्याचे वैभव गायकवाड यांनी नमूद केले.

नवी मुंबई मनपा क्षेत्रातील वाशी येथील धोकादायक जलकुंभाच्या भूमीपूजनावरून दोन गटात जोरदार वादंग झाला असून हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले आहे. भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक वैभव गायकवाड, माजी नगरसेविका विद्या गायकवाड यांनी जलकुंभाच्या जलपूजनाचा कार्यक्रम ठेवल्याने काही स्थानिक रहिवाशांनी आक्षेप घेतला. त्याबाबत त्यांना विचारणा केल्यानंतर हे प्रकरण वाढल्याने वाशी पोलिसांना प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.

First Published on: February 13, 2021 8:27 PM
Exit mobile version