भाजप-मनसे-कुणबी सेना युतीचा फुसका बार; केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना धक्का

भाजप-मनसे-कुणबी सेना युतीचा फुसका बार; केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना धक्का

मनसे, भाजप युती

पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत वाडा तालुक्यातील स्वतःच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भाजपसोबत मनसे आणि कुणबी सेनेची युती घडवून आणली. तेव्हा राज्यभर भाजप-मनसे युतीची बातमी ठळकपणे झळकली. प्रत्यक्षात मात्र भाजप-मनसे-कुणबी सेना युतीचा बार फुसका ठरल्याचे भाजपच्या पाचही उमेदवारांच्या पराभवाने दाखवून दिले आहे. स्वबळावर लढत असलेल्या राष्ट्रवादीने तीन तर शिवसेनेने दोन जागा जिंकत केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या होम ग्राऊंडवरच पराभूत केले.

पालघर जिल्हा परिषदेची पोटनिवडणुक अनेक कारणांनी चर्चेत होती. त्यातील खासदार राजेंद्र गावीत यांचा मुलगा रोहित गावीतची उमेदवारी आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची मनसे-कुणबी सेनेसोबतची युती खास बाब ठरली होती. गावितांसोबतच कपिल पाटील यांनाही मतदारांनी पराभवाचा झटका दिला. कपिल पाटलांनी युतीचा प्रयोग फक्त स्वतःच्या लोकसभा मतदारसंघातील वाडा तालुक्यापुरताच राबवला हेही विशेष. मात्र, युती झाल्यानंतर लगेचच अंतर्गत कुरबुरीही सुरु झाल्या होत्या. भाजपच्या पालसई गटातील उमेदवार धनश्री चौधरी यांच्या प्रचाराच्या बॅनरवर राज ठाकरे यांचा फोटो लहान छापल्यावरून मनसैनिक प्रचंड नाराज झाले होते. तेव्हा भाजपवर बॅनर बदलण्याची नामुष्की ओढवली होती. भाजप-मनसे कार्यकर्त्यांमधील संवादच बिघडल्याने धनश्री चौधरींना पराभवाचाही सामना करावा लागला.

हे कमी म्हणून की भाजप उमेदवाराच्या पतीने मतदानाच्या आदल्या रात्री थेट शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देऊन कपिल पाटलांना तोंडघशी पाडले होते. राजकीयदृष्ट्या सर्वच पक्षांनी गारगाव गटातील निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. असे असताना भाजपच्या अधिकृत उमेदवार करुणा वेखंडे यांचे पती आणि कपिल पाटलांचे खंदे समर्थक किशोर वेखंडे यांनी मतदानाच्याच आदल्यारात्री शिवसेनेला पाठिंबा दिल्याने करुणा वेखंडे पराभतू झाल्या.

वाडा तालुक्यातील पाचपैकी कपिल पाटील यांच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील गारगाव, मोज आणि आबिटघर या तीन गटांचा समावेश होता. त्यामुळे पाटलांनी निवडणुकीची सर्व सूत्रे स्वतःच्या हातात घेतली होती. भाजपचे पालघर जिल्ह्याध्यक्ष नंदकुमार पाटील वाड्याचेच. पण, त्यांना बाजूला सारून निवडणुकीची सर्व यंत्रणा कपिल पाटलांनी त्यांचे खंदे समर्थक योगेश पाटील यांच्याकडे सोपवली होती. उमेदवारी वाटण्यापासून निवडणुकीत रसद पुरवण्याची जबाबदारी योगेश पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. पाटील यांनी सारी प्रक्रिया स्वतःच्या हातात ठेवल्याने भाजपमधील मोठा गट नाराज झाला होता. यातून निर्माण झालेल्या पक्षांर्तगत कलहामुळे योगेश पाटलांकडे सूत्रे देण्याचा निर्णय कपिल पाटलांच्या अंगलट आला. परिणामी वाड्यातील पाचही गटात भाजप उमेदवारांचा पराभव झाला.

हेही वाचा –

..तर मुख्यमंत्र्यांना सिंधुदुर्गला म्हावऱ्यांचा पाहुणचार, राणेंचं आमंत्रण

First Published on: October 8, 2021 8:31 PM
Exit mobile version