पोलिसांनी योग्य ती पावले उचलावीत-आमदार राजेश पाटील

पोलिसांनी योग्य ती पावले उचलावीत-आमदार राजेश पाटील

पालघर : बोईसर मध्ये ७ व ८ मे या सलग दोन दिवस दोन गटातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी खुले आम हातात कोयता व कुर्‍हाडी घेऊन शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्तथेचा प्रश्न गंभीर होत चालला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती पावली उचलावीत अशा प्रकारचे निवेदन बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी पालघर पोलीस अधीक्षकांना दिले आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून बोईसर ओळखले जाते. नोकरी धंद्या निमित्त देशातील अनेक राज्यातील नागरिक बोईसर येथे वास्तव्यास आहेत. गेल्या आठवड्यात बोईसर मध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सलग दोन दिवस कोयते कुर्‍हाडी घेऊन बोईसरमधील वातावरण दूषित केले होते. पोलीस दलाने अशा गोष्टीकडे दुर्लक्ष न करता त्वरित गुन्हेगारांवर कारवाई करायला हवी पोलीस प्रशासनाकडून अजूनही या प्रकरणावर कारवाई झाली नसल्याने महिला शाळकरी मुले विद्यार्थी यांच्यामध्ये भीतीची छाया आहे. पोलीस योग्य पावले उचलत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. अशी दहशत माजवणार्‍या गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पाटील यांनी पत्रामध्ये केली आहे. औद्योगिक कारखान्यात बेकायदा भंगार, केमीकल माफिया, चरस, गांजा या सारखे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. गुन्हेगारावर पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याने स्थानिक नागरिक संतप्त आहेत. शहरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य पावले उचलावीत व योग्य ती कार्यवाही करून नागरिकांच्या मनात असलेली भीती दूर करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

First Published on: May 18, 2023 9:45 PM
Exit mobile version