तहसीलदार वाड्याचे , राहतात कल्याणला ?

तहसीलदार वाड्याचे , राहतात कल्याणला ?

वाडा: तालुक्याच्या तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहे. या निवासस्थानाच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या दोन वर्षांपूर्वी लाखो रूपये खर्च करण्यात आला होता. मात्र, दुरूस्तीनंतरही ते राहात नसल्याने शासकीय निवासस्थान धूळ खात पडून आहे. या मुख्यालयी निवासस्थानात ते राहात नसून त्यांचा मुक्काम कल्याणला असल्याची चर्चा नागरिकांत आहे. वाडा तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान आहे.या निवासस्थानात तत्कालीन तहसीलदार राहात होते. मात्र, तहसीलदार उध्दव कदम यांनी वाडा तालुक्याचा कारभार हाती घेतल्यापासून ते शासकीय निवासस्थानात राहात नसून ते कल्याण वरून ये-जा करीत असतात. तालुक्याचे पालक या नात्याने तहसीलदारांनी वाडा या मुख्यालयी राहणे गरजेचे व बंधनकारक आहे. मात्र,तहसीलदार हे कल्याणवरून दररोज ये-जा करत असल्याने त्यांच्यापासून इतर कर्मचारी काय बोध घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संदर्भात तहसीलदार उध्दव कदम यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते सुट्टीवर असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले.त्यांना दूरध्वनीवर संपर्क साधला असता तो बंद होता.

अपवाद तहसीलदार

उपविभागीय अधिकारी,पोलीस निरीक्षक असे अनेक अधिकारी वाड्यामध्येच राहात असून फक्त याला अपवाद तहसीलदार ठरत आहेत.तालुक्याचे मुख्य अधिकारी म्हणून तहसीलदारांकडे पाहिले जाते. एखादी आपत्कालीन घटना,नैसर्गिक घटना,पूर परिस्थिती,भूकंप, कायदा व सुव्यवस्थेचा प्र अशा वेळी तहसीलदारांचे आदेश सर्वोच्च मानले जातात. मात्र अशा वेळी तहसीलदार तालुक्यात उपस्थित नसल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तहसीलदारांनी वाडा शहरात एक फ्लॅट भाड्याने घेऊन मी येथे राहत असल्याचे दाखवत आहेत. मात्र ते कल्याण वरून दररोज ये- जा करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

 

तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान नादुरुस्त अवस्थेत असल्याने ते दुरूस्त करून घेण्यात आले आहे.ते वाडा येथेच फ्लॅटमध्ये राहात असून सुट्टीच्या दिवशी ते कल्याण येथे जात असतात.

– सुनिल लहांगे,नायब तहसीलदार

First Published on: November 23, 2022 9:13 PM
Exit mobile version