केळवे समुद्रकिनाऱ्याची दयनीय अवस्था

केळवे समुद्रकिनाऱ्याची दयनीय अवस्था

समुद्रातील भरतीचे पाणी आणि वादळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध केळवे बीचच्या किनाऱ्याची प्रचंड प्रमाणात धूप होऊन अत्यंत भकास अवस्था झाली आहे. यासंदर्भात, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने किनाऱ्याची धूप थांबवण्यासाठी धुप प्रतिबंधक वृक्षांच्या लागवडीची मागणी वनरक्षक वनविभाग, केळवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. गेल्या काही वर्षात पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या केळवे बीच परिसरातील किनाऱ्याची दयनीय अवस्था झालेली आहे. समुद्रातील भरतीचे पाणी आणि मुसळधार वादळी पाऊस यामुळे मागील काही वर्षात किनाऱ्याची प्रचंड प्रमाणात धूप झालेली आहे.

भविष्याच्या दृष्टीने सदर परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठी वेळीच किनाऱ्याची धूप टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीमध्ये शिरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे.

केळवे समुद्र किनाऱ्याची होणारी धूप टाळण्यासाठी आत्तापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी गावातील विविध संघटना तसेच गावकरी एकवटले आहेत. कोणत्या प्रकारच्या झाडांची लागवड करणे फायदेशीर ठरेल याबाबतीत वनविभागाचे मार्गदर्शन अपेक्षित आहे.
– प्रथमेश प्रभू-तेंडुलकर, सहसचिव, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

किनारा परिसराचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. काही दिवसांपूर्वी वसईतील अर्नाळा किल्ला येथे प्रचंड सागरी लाटांनी तेथील राहती घरे उद्ध्वस्त करून लोकांचे आर्थिक नुकसान केले होते. त्याची गंभीरपणे दाखल शासनानेही घेतली आहे. म्हणूनच पालघर जिल्ह्यातील केळवे किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक वृक्षांची लागवड करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यासंदर्भातील पत्र वनरक्षक वनविभाग, केळवे यांना देण्यात आले असुन त्याची प्रत पालघर जिल्हाधिकारी, सफाळे वनपरिक्षेत्र अधिकारी, केळवे ग्रामपंचायत, केळवे स्पोर्ट्स असोसिएशन आणि केळवे संवर्धन मोहीम यांना देखील पाठवण्यात आली आहे.

First Published on: June 16, 2021 1:38 AM
Exit mobile version