दोन वर्षांच्या लॉकडाऊन खंडानंतर कोकणात यंदा लाखो चाकरमान्यांनी हजेरी लावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि नजिकच्या शहारतील कोकणी नागरिकांना गावी जाता आलं नव्हतं. मात्र, यंदा सण उत्सवावरील निर्बंध हटवण्यात आल्याने कोकणात लाखोच्या संख्येने चाकरमानी दाखल झाले. गणेश चतुर्थीपासून कोकणात उत्साह दिसत होता. सोमवारी गौरी गणपतीचं उत्साहात विसर्जन करण्यात आलं. यावेळी पारंपरिक पद्धतीने सावर्जनिक विसर्जन सोहळा ठिकठिकाणी पार पडला. कोकणातील प्रत्येक वाडीत सर्व घरातून एकदम गणपती बाहेर आणले जातात. त्यानंतर वाजत-गाजत त्यांना विसर्जन घाटापर्यंत नेलं जातं. तिथं गेल्यावर सार्वजनिक आरती केली जाते. त्यानंतर गाऱ्हाणं घातलं जातं. अनेकजण विसर्जन घाटावर बाप्पाकडे नवस करतात. यथासांग आरती, विधी पूर्ण झाले की भक्तीभावाने बाप्पाचं विसर्जन केलं जातं. यावेळी अबालवृद्धांनी साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप दिला. शिवाय, पावसाची संततधार सुरू असल्याने विसर्जनाला आणखी उत्साह आला होता.