मुंबई : ‘मिशन मुंबई’बरोबरच भाजपाने 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘मिशन बारामती’ देखील हाती घेतले आहे. पवार कुटुंबीय ज्या मंदिरात जाऊन प्रचाराचा नारळ फोडायचे त्याच कन्हेरीच्या हनुमान मंदिरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गेले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, ‘मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता, हे आत्ता आलेले ते कोण होते?’ अशी उपहासात्मक टीका केली आहे.
1990 नंतर शरद पवार साहेबांचे
नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं.त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत; ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 7, 2022
शरद पवार यांचे कुटुंबीय गेली 55 वर्षे कन्हेरीतील हनुमान मंदिरात दर्शन घेऊनच प्रचाराचा नारळ फोडतात. या काळात शरद पवार एकही निवडणूक हरलेले नाहीत. त्याच मंदिरात चंद्रशेखर बावनकुळे दर्शनासाठी गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच केवळ देश मजबूत करू शकतात, हे जनतेला आता समजले आहे. देशात जनताच निर्णय घेत असल्याने अनेक राजकीय किल्ले आता उद्ध्वस्त होतील. त्या मानाने राष्ट्रवादीचा बारामतीचा बालेकिल्ला फारसा मोठा नाही. बारामतीत देखील आमचा खासदार जिंकावा, अशी आमची भूमिका आहे. त्याबाबतची तयारी आमची असणार आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले होते.
यावरून माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून बावनकुळे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. 1990नंतर शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही, असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उमगले आहे. त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप, जे कधी सत्यात उतरले नाहीत, ते बेलगामपणे आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
‘बारामतीचा गड जिंकून दे’ असे साकडे बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन कुणीतरी घातले. याच मारूतीच्या समोर उभे राहून शरद पवार गेली 60 वर्षे प्रत्येक निवडणुकीचा फॉर्म दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते? अशी उपहासात्मक टीका करतानाच, बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही, उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे…, असा टोलाही डॉ. आव्हाड यांनी लगावला आहे.