…’कारे’वाले शेपूट घालून बसले आहेत, सीमावादावरून ठाकरे गटाचा भाजपावर ह्लाबोल

…’कारे’वाले शेपूट घालून बसले आहेत, सीमावादावरून ठाकरे गटाचा भाजपावर ह्लाबोल

मुंबई : कर्नाटकात भाजपाचे सरकार आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना तेथील सरकारने बेळगावात येण्यापासून रोखले. महाराष्ट्राच्या शेकडो गावांवर त्यांनी हक्क सांगितला. त्यामुळे प्रकरण ‘अरे’च्या पुढे गेले आहे व ‘कारे’वाले शेपूट घालून बसले आहेत. ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे थोबाड रंगवले असते, असा जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाने भाजपावर केला आहे.

एखादे सरकार रामभरोसे चालते असे नेहमीच बोलले जाते, पण महाराष्ट्राचे मिंधे सरकार हे नवस-आवस, तंत्र-मंत्र यावर चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला या गंडे-दोरे-ताईतवाल्या सरकारविरोधात रान उठवावे लागेल. बेळगाव महाराष्ट्रात येवो असा नवस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मंत्री-आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला का जात नाहीत, असा प्रश्न आम्ही विचारला तो त्यामुळेच, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

भाजपाचे ढोंग
शिंदे-फडणवीस सरकारने कानडी मुख्यमंत्र्यांच्या मनमानीपुढे बुळचट धोरण स्वीकारले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोज सकाळी उठून महाराष्ट्राला बेईज्जत करण्याचा जाहीर कार्यक्रम सुरू केला आहे. त्यावर विरोधी पक्षांना एकत्र येऊन वज्रमुठीचा ठोसा मारावा लागेल. आता इथेही भाजपच्या आशीष शेलारांनी तोलून मापून सांगितले की, ”कर्नाटकने ‘अरे’ केल्यास ‘कारे’ने उत्तर देऊ.” भाजपचे हे ढोंग आहे, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे.

…त्यांनी ‘कारे’ची भाषा वापरावी, हाच एक विनोद
मुळात जे छत्रपती शिवरायांचा अपमान निमूट सहन करतात त्यांनी ‘कारे’ची भाषा करावी हाच एक विनोद आहे. महाराष्ट्राची जनता मूर्ख नाही हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आजही एका सुरात हे ठणकावून बोलायला तयार नाहीत की, ”बेळगाव कारवारसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्राचाच! आणि तो पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही.” शिंदे-फडणवीस यांनी एकदा तरी ही गर्जना केली काय?, असा सवाल ‘सामना’च्या अग्रलेखात करण्यात आला आहे.

चीनच्या घुसखोरीवरून केंद्रावर निशाणा
तिकडे कानडी मुख्यमंत्री सीमाभागासाठी लढतात, महाराष्ट्राच्या गावांवरही दावा ठोकतात व महाराष्ट्र सरकारचे शेलारमामा नेभळटासारखे फक्त ‘अरे’ ला ‘कारे’ बोलू असे बोलतात! हे म्हणजे असेच झाले की, चीनने लडाखमध्ये घुसून आपला भूभाग ताब्यात घ्यायचा आणि नंतर ‘आम्ही त्यांना आमची इंचभरही जमीन त्यांना घेऊ देणार नाही,’ असा दम भरायचा! अरे बाबांनो, ते आधीच हातभर आत घुसले आहेत. तसेच महाराष्ट्रात घडले आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

नव्या विकृतीचा महाराष्ट्राच्या राजकारणात उदय
कानडी सरकारची ही ‘घुसखोरी’ फक्त नेभळट, लाचार आणि गुजरातच्या ताटाखालचे मांजर बनलेले सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल्यामुळेच सुरू आहे. खोके सरकारचे आमदार महिलांना गलिच्छ भाषेत शिव्या देतात. दुसरे आमदार शिवसेना नेत्यांना आई-बहिणीवरून कॅमेऱ्यासमोर शिव्या देतात. अशा नव्या विकृतीचा उदय महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहे. तो एकत्रित मोडून काढावाच लागेल, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

भ्रमाचा भोपळा लवकर फुटेल
शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहेत. त्यावर ठोस भूमिका घेतली आहे असे कुठेच दिसत नाही. शिंदे-फडणवीस सरकार हे मर्जीतल्या चाळीसेक खोकेबाज आमदार व बिल्डर ‘मित्रां’साठी सुरू आहे. शिवरायांचा अपमान व जनता गेली उडत असे कोणास वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल. अरे ला कारे म्हणजे नक्की काय हे दाखविण्यासाठी हिंमतबाज मर्दाचे मनगट लागते. ते लवकरच दिसेल, असा इशाराही ठाकरे गटाने दिला आहे.

First Published on: December 5, 2022 8:20 AM
Exit mobile version