रायगडमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे हात

रायगडमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे हात

रायगड जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी उरण नगरपरिषदेतर्फे कपडे, अन्नधान्याची मदत

महाड परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराला महाप्रलयाचा तडाखा बसला आहे. रायगड, चिपळूण, महाड आदी ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेकडो नागरिक पूरात अडकलेले आहेत. पूरामुळे घराघरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचीही नासधूस झाली. दरम्यान,रायगडमधील पूरग्रस्तांसाठी उरण नगरपरिषद आणि उरण भाजपच्या वतीने कपडे, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला एक टेम्पो तातडीने रवाना करण्यात आला असल्याची माहिती उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी दिली.रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. या पूरामुळे जिल्ह्यातील महाड ,पोलादपूर, माणगाव आदी अनेक गावे पूराखाली गेली आहेत.अनेकजण पूरात वाहून गेले आहेत. तर काहीजण पूरात मृत्यूमुखी पडले आहेत. पूरात सर्वस्व वाहून गेल्याने पूरग्रस्तांना कपडे, अन्नधान्य,पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे.

पूरग्रस्तांना मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्वोतोपरी मदत करण्याचे आवाहन रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उरण नगर पालिका, कर्मचारी, नगराध्यक्षा, नगरसेवक यांनी शहरात फिरून उरणवासियांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिक, व्यापारी शहरवासीयांनी जोरदार प्रतिसाद दिला.या प्रयत्नातुन कपडे,अन्नधान्य,अंथरुण-पांघरुन असा टेम्पो भर सामान काही तासातच उरणमध्ये जमा झाले होते. जमा झालेले एक टेम्पो सामान तातडीने जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी दिली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या मोहिमेत नगराध्यक्षा सायली म्हात्रे ,उपनगराध्यक्ष जयविन कोळी ,भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह मुख्याधिकारी संतोष माळी ,कर्मचारी ,अधिकारी व सफाई कामगार आदी सहभागी झाले होते .

‘स्वदेस’कडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

अतिवृष्टीमुळे महाड आणि पोलादपूर तालुक्यात आलेल्या महापुराने आतोनात नुकसान झाले. पूरग्रस्त कुटुंबांची गरज लक्षात घेऊन रॉनी स्क्रूवाला आणि झरिना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाऊंडेशनने तात्काळ टास्क फोर्स स्थापन करून मदत रवाना केली. पालकमंत्री अदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलेल्या आवाहनानुसार शुक्रवारी रात्री भोराव, तळीये, आकले येथे १ हजार अन्न पाकिटे आणि पिण्याचे पाणी पोहचविण्यात आले.

लोणेरे येथील जय मल्हार ग्रुपतर्फे महाड येथील गरजूंना मदत

महाड  येथे आलेल्या महापूरामुळे महाडकरांचे अतोनात हाल झाले असून आज तीन दिवस झाले तरीदेखील महाड शहरात विद्युत पुरवठा बंद असल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल झाले असून जय मल्हार ग्रुप लोणेरे येथील युवकांमार्फत महाड शहरात पिण्याचे पाणी, बिस्किटे व धान्याचे वाटप करण्यात आले.

 


हेही वाचा – तळीये दरड प्रवण गावांच्या यादीतच नव्हते – अजित पवार

First Published on: July 24, 2021 3:00 PM
Exit mobile version