भारताच्या रिले संघाची सुवर्ण कामगिरी

भारताच्या रिले संघाची सुवर्ण कामगिरी

वीरधवल खाडे

श्रीहरी नटराज, आनंद, अनिलकुमार, साजन प्रकाश आणि वीरधवल खाडे या चौघांच्या संघाने ४X१०० रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावत आशियाई वयोगट अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत भारताचे पदकांचे खाते उघडले. मंगळवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या रिले संघाने ३ मिनिटे आणि २३.७२ सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले. इराणच्या संघाने ३ मिनिटे आणि २८.४६ सेकंद या वेळेत ही स्पर्धा पूर्ण करत रौप्य, तर उझबेकिस्तानच्या संघाने ३ मिनिटे आणि ३०.५९ सेकंदासह कांस्यपदक मिळवले.

४X१०० रिले स्पर्धेची भारतासाठी श्रीहरी नटराजने सुरुवात करत १०० मीटरचे अंतर ५०.६८ सेकंदात पूर्ण केले. त्यानंतर आनंदने ५१.२८ अशी, तर तिसर्‍या क्रमांकावर गेलेल्या साजनने ५१.३७ सेकंद अशी वेळ नोंदवत भारताला आघाडीवर ठेवले. अखेर महाराष्ट्राच्या वीरधवलने खाडेने १०० मीटरचे अंतर अवघ्या ५०.३९ सेकंदात पूर्ण केले आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

या स्पर्धेत संघाला चांगली सुरुवात करून देणे आवश्यक होते. आम्ही चौघांनीही अप्रतिम कामगिरी केली. या स्पर्धेत भारताला पहिले पदक जिंकवून देऊ शकलो याचा आनंद आहे, असे श्रीहरी म्हणाला.

महिलांच्या ४X१०० रिले स्पर्धेत भारताच्या संघाने ४ मिनिटे आणि ०.७६ सेकंद अशी वेळ नोंदवली. त्यामुळे त्यांना रौप्यपदक मिळाले. भारताच्या संघात ऋतुजा खाडे (५९.८३ सेकंद), दिव्या सातीजा (१ मिनिट, ०१.६१ सेकंद), शिवानी कटारिया (५९.५७ सेकंद) आणि मीना पटेल (५९.७५ सेकंद) यांचा समावेश होता. या स्पर्धेत थायलंडने ३ मिनिटे आणि ५४.२९ सेकंदासह सुवर्णपदक मिळवले. तर ४ मिनिटे आणि ०८.६४ सेकंद अशी वेळ नोंदवणार्‍या हाँगकाँगला कांस्यपदक मिळाले.

भारताचे दुसरे रौप्यपदक ४X१०० फ्री-स्टाईल रिलेच्या गट-२ मुले यात आले. वेदांत माधवन (५५.२७ सेकंद), उत्कर्ष पाटील (५७.१० सेकंद), साहिल लष्कर (५७.८३ सेकंद) आणि शोन गांगुली (५४.२९ सेकंद) यांच्या संघाने एकूण ३ मिनिटे आणि ४१.४९ सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले.

First Published on: September 25, 2019 6:19 AM
Exit mobile version