भारत आणि न्यूझीलंड या दोन संघातील मुंबई टेस्ट मॅचच्या सामन्यावर एकापाठोपाठ एक येणारी संकट संपण्याचे नावच घेत नाहीत. कोरोनाचा नवा व्हेरीएंट ओमिक्रॉनने डोक वर काढलेले असतानाच दुसरीकडे आता नव्या आव्हानाचा सामना मुंबई कसोटी दरम्यान करावा लागणार आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांची हिरमोड होण्याची शक्यता आहे. कानपुरचा सामना रद्द झाल्यानंतर सगळ्यांच्या नजरा या मुंबईतील कसोटी सामन्यावर आहेत. दोन्ही संघ या मॅचमध्ये जिंकून सिरीज आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. पण या सामन्यात सध्याचे मुंबईतील वातावरण हे व्हिलन ठरू शकते असाही एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुंबईत पावसाचा २५ टक्के अंदाज असल्याचा हवामान विभागाचा अलर्ट आहे.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये मुंबईतील कसोटी सामना हा ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान खेळण्यात येणार आहे. पण सामन्यामध्ये पावसामुळे विलंब होण्याची शक्यता आहे. मुंबईतील कोरोनाचा निर्बंध पाहता ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना खेळवला जाणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने याबाबतची घोषणा आधीच केली आहे. पण पावसाच्या संकटामुळे सामन्यावर संकट आणखी गडद झाले आहे. जर पावसामुळे सामना जर अनिर्णयीत ठरला तर न्यूझीलंडचे भारतात कसोटी मालिक जिंकण्याचे १९८८ पासूनचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. मुंबईतील पहिल्या दिवसाचा खेळ हा पावसामुळे रद्द होऊ शकतो अशी माहिती आली. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची रिमझिम सुरू आहे. पावसाचा असाच अंदाज शुक्रवारसाठीही आहे. त्यामुळेच मुंबई कसोटीतील पहिल्या दिवसावर पावसामुळे पाणी फिरू शकते.
दरम्यान मुंबईतल्या पावसामुळे दोन्ही संघांना आपला सराव सामना रद्द करण्याची वेळ आली. आज गुरूवारीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळेच भारतीय पावसाचा अंदाज पाहता वांद्रे कुर्ला परिसरात जाणार आहे. याठिकाणी इंडोर ट्रेनिंगची सुविधाही देण्यात आली आहे. सध्या वानखेडे स्टेडिअमवर ही सुविधा नाही. मुंबईतील पावसाळी हवामानात या वातावरणाचा फायदा हा वेगवान गोलंदाज तसेच फिरकी गोलंदाजांनी होण्याची शक्यता आहे. मुंबईतील कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर कोणत्याही प्रकारचे गवत नाही. त्यामुळेच मध्यमगती गोलंदाजांना या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. तसेच वातावरणातील आद्रतेचा परिणाम हा खेळादरम्यानही होऊ शकतो. सततच्या पावसाने खेळपट्टी पुर्णपणे झाकून ठेवण्यात आली आहे.
पहिल्या दिवशी पावसाचा अंदाज असला तरीही दुसऱ्या ते पाचव्या दिवसा दरम्यान खेळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भारतीय क्रीडा रसिकांकडूनही मुंबई कसोटी सामन्यावर नजरा लागलेल्या आहेत. त्यामुळे पावसाच्या व्यत्ययाने खेळ रद्द होऊ नये अशीच प्रार्थना क्रीडाप्रेमी करत आहेत. शुक्रवारी पहिल्याची दिवशी पावसाचा अंदाज पाहता याचा परिणाम हा खेळ विलंब होण्यावर किंवा खेळ रद्द होण्यावरही होऊ शकतो. त्यामुळे उरलेल्या दिवसात खेळ होईल असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.
संघातून कोणाला डच्चू ?
खराब फॉर्ममध्ये असलेल्ल्या अजिंक्य रहाणेची पाठराखण हेड कोच राहुल द्रविड आणि बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांनी केली आहे. त्यामुळे मुंबईकर अजिंक्य रहाणेला या कसोटीच्या सामन्यात पुन्हा संधी मिळणार हे नक्की. पण विराट कोहली कर्णधार पदाची धुरा सांभाळत पुनरागमन करणार असल्यानेच संघातून बाहेर कोण जाणार याबाबतचा मोठा तिढा आहे. कसोटी पदार्पण केलेला श्रेयस अय्यरचा फॉर्म पाहता त्याला टीममधून डच्चू मिळणार नाही हे निश्चित आहे. पण त्याचवेळी फॉर्मसाठी स्ट्रगल करणाऱ्या मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यामध्ये अनुभवामुळे पुजाराला संघात स्थान मिळू शकते. त्यामुळे मयांक अग्रवालला मुंबई कसोटीत डच्चू मिळण्याची अधिक शक्यता आहे.