श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने अष्टपैलू रविंद्र जडेजाच्या तडाकेबाज शतकाच्या जोरावर धावांचा डोंगर उभारला आहे. यष्टीरक्षक रिषभ पंत आणि रविंद्र जडेजाच्या तडाखेबंद खेळीने भारताने आपला पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने दिवसअखेर ४ बाद १०८ धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा संघ ४६६ धावांनी पिछाडीवर आहे.
विराट कोहलीच्या शतकी कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर ऋषभ पंतच्या फटकेबाजीने छाप पाडली. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला फलंदाजी करण्यासाठी आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा मैदानात फलंदाजीसाठी उतरले. दोघांनीही चांगला खेळ खेळत शतकी भागिदारी केली. मात्र श्रीलंकन गोलंदाज कमलच्या चेंडूवर अश्विन झेलबाद झाला. त्याने ८२ चेंडूंमध्ये आठ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. तर दुसरीकडे जडेजाने मैदानावर घट्ट पाय रोवून श्रीलंकन टीमला जेरीस आणले. तर दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने शानदार खेळ करत २२८ चेंडूंचा सामना करत १७५ धावा फटकावल्या. यामध्ये १४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. जडेजाच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. पुढे जयंत यादवच्या रुपाने भारताला आठवा धक्का बसला. फर्नांडोच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. यादवने फक्त दोन धावा केल्या. मात्र पुढे मोहम्मद शामीने जडेजाला चांगली साथ दिली. शामीच्या मदतीमुळेच भारतीय धावफलक थेट ५७८ वर पोहोचला. शेवटी भारताने आपला डाव घोषित केल्यामुळे मोहम्मत शामी आणि जडेजा नाबाद राहीले. श्रीलंकेकडून कमल, विश्वा फर्नांडो, एम्बुल्डेनिया या गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर लाहिरी कुमरा आणि धनंजय सिल्वा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
भारताच्या ५७४ धावांच्या प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या श्रीलंकन संघाचे चार फलंदाज तंबुत परतले आहेत. श्रीलंकेचे सलामीवीर कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि लहीरु थिरीमाने यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, जडेजाने करुणारत्नेला पायचित करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर आश्विनने दुसरा सलामीवीर थिरीमानेला पायचित करत तंबुत पाठवले. यानंतर मैदानावर आलेले निसंका आणि अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण भारताचा उपकर्णधार तेज गोलंदाज बुमराहने मॅथ्यूजला पायचित करत जोडी फोडली. मॅथ्यूज तंबुत परतल्यानंतर त्याच्या जागी आलेला धनंजया डी सिल्वा १ धावेवर बाद झाला. त्याला आश्विनने माघारी धाडलं. भारताकडून आश्विनने २ तर बुमराह, जडेजाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
हेही वाचा : Davis Cup 2022 : भारताचे निर्भेळ यश; डेन्मार्कचे वाजले बारा