भारताच्या रविचंद्रन अश्विनला आयसीसीच्या पुरस्कारासाठी नामांकन

भारताच्या रविचंद्रन अश्विनला आयसीसीच्या पुरस्कारासाठी नामांकन

रविचंद्रन अश्विन

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन, इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि वेस्ट इंडिजचा नवखा फलंदाज कायेल मेयर्स यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. अश्विन सध्या चांगल्या फॉर्मात असून फेब्रुवारी महिन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामने खेळले. या तीन कसोटीत २४ विकेट घेतानाच त्याने एक शतकही झळकावले. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे भारताला इंग्लंडविरुद्ध दुसरा आणि तिसरा कसोटी सामना जिंकण्यात यश आले. तिसऱ्या सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेटचा टप्पाही गाठला होता. ‘तीन सामन्यांत १७६ धावा करतानाच २४ विकेट घेतल्यामुळे अश्विनला फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे,’ असे आयसीसीने त्यांच्या पत्रकात म्हटले.

रूटची दमदार कामगिरी

तसेच इंग्लंडचा कर्णधार रूटने भारताविरुद्ध या मालिकेच्या पहिल्या सामन्यात २१८ धावा केल्या होत्या. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानावर असून त्याने तीन सामन्यांत ३३३ धावा केल्या आहेत. दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या मेयर्सने कसोटी पदार्पणात बांगलादेशविरुद्ध २१० धावांची मॅचविनिंग खेळी केली होती. त्यामुळेच अश्विनसह या दोघांना फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

First Published on: March 2, 2021 7:52 PM
Exit mobile version