IPL 2021 : एका सामन्याचा प्रश्न, मुंबई दमदार कमबॅक करणारच – सूर्यकुमार

IPL 2021 : एका सामन्याचा प्रश्न, मुंबई दमदार कमबॅक करणारच – सूर्यकुमार

सूर्यकुमार यादव

कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव वगळता मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी यंदाच्या आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. मुंबईचा शुक्रवारी पंजाब किंग्सविरुद्ध सामना झाला. या सामन्यात मुंबईला २० षटकांत केवळ १३१ धावा करता आल्या. मुंबईकडून रोहितने ५२ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. त्याला सूर्यकुमारने ३३ धावा करत उत्तम साथ दिली. मात्र, या दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या एकाही फलंदाजांना २० धावांचा टप्पा पार करता आला नाही. मुंबईकडे रोहित आणि सूर्यकुमार यांच्यासह डी कॉक, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड यांसारखे अनुभवी फलंदाज आहेत. यंदा हे सर्व अपयशी ठरत आहेत. परंतु, या फलंदाजांना लवकरच लय सापडेल, असा सूर्यकुमारला विश्वास आहे.

फलंदाजांना लवकरच लय सापडेल

आमचे सर्वच फलंदाज नेट्समध्ये कसून सराव करत आहेत. प्रत्येक सराव सत्रात ते खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे एका सामन्याचा प्रश्न आहे. आमच्या फलंदाजांना लवकरच लय सापडेल आणि ते दमदार पुनरागमन करतील याची मला खात्री आहे. आम्ही संघ म्हणूनही लवकरच सर्वोत्तम खेळ करू. आमचा प्रत्येक खेळाडू अधिक जबाबदारीने खेळण्याचा प्रयत्न करत आहे. काही कारणाने त्यांना अपेक्षित यश मिळत नाही.  मात्र, आम्ही लवकरच दमदार पुनरागमन करू, असे सूर्यकुमार म्हणाला.

खेळपट्टीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न

मुंबईला यंदा पाच पैकी केवळ दोन सामने जिंकता आले आहेत. मुंबईचे पाचही सामने चेन्नईत झाले असून येथील परिस्थिती थोडी वेगळी असल्याचे सूर्यकुमारने स्पष्ट केले. चेन्नईच्या खेळपट्ट्या, येथील परिस्थिती थोडी वेगळी आहे. मात्र, आमचा या खेळपट्टीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न होता. आम्हाला याआधीही काही मोसमांत सुरुवातीला चांगला खेळ करण्यात अपयश आले होते. मात्र, आमच्यात सर्वोत्तम खेळ करून दमदार पुनरागमन करण्याची क्षमता असल्याचे सूर्यकुमारने सांगितले.

First Published on: April 24, 2021 11:08 PM
Exit mobile version