IPL 2021 : आयपीएलनंतर टी-२० वर्ल्डकपचा नंबर? दोन्ही स्पर्धा भारताऐवजी ‘या’ ठिकाणी घेण्याबाबत चर्चा

IPL 2021 : आयपीएलनंतर टी-२० वर्ल्डकपचा नंबर? दोन्ही स्पर्धा भारताऐवजी ‘या’ ठिकाणी घेण्याबाबत चर्चा

भारताऐवजी युएईमध्ये टी-२० वर्ल्डकप?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा उर्वरित मोसम बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच कोरोनाने आयपीएलच्या बायो-बबलमध्ये शिरकाव केल्याने बीसीसीआयला ही स्पर्धा स्थगित करणे भाग पडले. मात्र, बीसीसीआयच्या या निर्णयानंतर आता यावर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपवरही प्रश्नचिन्ह आहेत. टी-२० वर्ल्डकपला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होणार असून नोव्हेंबरच्या जवळपास भारतात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये सहभागी होणारे संघ भारतात ही स्पर्धा खेळण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत. या परिस्थितीत आयपीएलचा उर्वरित मोसम आणि टी-२० वर्ल्डकप भारताऐवजी युएईमध्ये घेण्याबाबत बीसीसीआय विचार करत आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता

यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी-२० वर्ल्डकप होणार आहे. सप्टेंबरपर्यंत कोरोनाची दुसरी लाट संपली तरी त्यानंतर कोरोनाची तिसरी लाट येऊ शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या परिस्थितीत भारतात टी-२० वर्ल्डकप आयोजित करणे अशक्य होईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे टी-२० वर्ल्डकप भारतातून युएईत हलवण्याची मागणी आता जोर धरत आहे.

बीसीसीआयची प्रमुख मंत्र्यांशी चर्चा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) पुढील दोन महिने भारतातील परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास टी-२० वर्ल्डकप इतरत्र हलवणे भाग पडणार आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याबाबत केंद्र सरकारमधील प्रमुख मंत्र्यांशी चर्चा केल्याचे समजते. तसेच या चर्चेअंती टी-२० वर्ल्डकप भारतात न घेता, युएईमध्ये आयोजित करणे योग्य ठरेल असे मत व्यक्त करण्यात आले आहे. ही स्पर्धा युएईत झाली, तरी बीसीसीआयच स्पर्धेचे आयोजन करेल.

First Published on: May 5, 2021 5:12 PM
Exit mobile version