IPL 2024 : पांड्याची गोलंदाजी पाहून सुनील गावसकरही संतापले, म्हणाले – सर्वात वाईट…

IPL 2024 : पांड्याची गोलंदाजी पाहून सुनील गावसकरही संतापले, म्हणाले – सर्वात वाईट…

पांड्याची गोलंदाजी पाहून सुनील गावसकरही संतापले

मुंबई : रविवारी (ता. 14 एप्रिल) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई वि. चेन्नई सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आयपीएल 2024 मधील या 29 व्या सामन्यानत चेन्नई सुपर किंग्ससने मुंबई इंडियन्ससमोर 207 धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु, मुंबईच्या संघाला केवळ 186 धावाच करता आल्या. पण या सामन्याच्या पराभवाचे पूर्ण खापर आता कर्णधार हार्दिक पांड्या याच्यावर फोडण्यात येत आहे. याबाबत स्वतः भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी हार्दिकच्या गोलंदाजीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (IPL 2024 Sunil Gavaskar got angry after seeing Hardik Pandya bowling)

चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करत 206 धावांचा डोंगर उभा केला. पण मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची गोलंदाजी पाहताना चेन्नईच्या संघाकडून 185-190 धावा होतील असे वाटले होते. पण शेवटच्या षटकांमध्ये पांड्याला धोनीच्या फलंदाजीला सामोरे जावे लागले आणि धोनीने शेवटचे चार चेंडू खेळत चेन्नईच्या धाव फलकांत 20 धावांची भर घातली. ज्याचा मोठा फटका मुंबई इंडियन्सच्या संघाला बसला. कारण याच 20 धावा मुंबईच्या संघाला भारी पडल्या. कारण कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला धोनीने शेवटच्या चार चेंडूंमध्ये झोडपले आणि मुंबई समर्थकांची निराशा झाली. पण यामुळे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी लाइव्ह कमेंट्रीमध्येच पांड्याला झापायला सुरुवात केली.

हेही वाचा… MI vs CSK : विराटची विनंती पण हार्दिक पांड्या…; चाहत्यांकडून होतोय सातत्याने ट्रोल

लाइव्ह कमेंट्री करताना माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्या खेळीबाबत आपला रोष व्यक्त केला. कमेंट्री करताना गावसकर म्हणाले की, ‘गेल्या बऱ्याच काळापासून मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात वाईट गोलंदाजी होती. पहिला षटकार ठीक होता… समोरचा फलंदाज आता लेंथ बॉलचीच वाट बघतोय हे जाणूनही तुम्ही पुढचा चेंडूही लेंथ टाकता आणि तिसरा चेंडू फुलटॉस टाकता. तुम्हाला माहीत आहे की, तो षटकारच मारणार तरीही तुम्ही पुन्हा तशीच गोलंदाजी करता,’ असे म्हणत सुनील गावसकर यांनी प्रश्न उपस्थित केले.

इतकेच नाही तर शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाडने इतकी चांगली फलंदाजी केली असली तरीही त्यांना रोखता आले असते. चेन्नईला देखील 185-190 धावांपर्यंत मर्यादित ठेवता आले असते, असेही त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. त्यांच्या या विधानाला त्यावेळी त्यांच्यासोबत कमेंट्री करणाऱ्या केविन पीटरसन यानेही सहमती दर्शवत म्हटले की, आता काहीतरी घडणे अपेक्षित आहे, कारण यामुळे हार्दिकच्या खेळावर ही परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली.


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 15, 2024 1:17 PM
Exit mobile version