IND vs ENG : माझी मागील १५ कसोटीतील कामगिरी बघा! संघाबाहेर होण्याच्या चर्चेबाबत रहाणेचे विधान

IND vs ENG : माझी मागील १५ कसोटीतील कामगिरी बघा! संघाबाहेर होण्याच्या चर्चेबाबत रहाणेचे विधान

अजिंक्य रहाणे

भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सपशेल अपयशी ठरला. या कसोटीच्या पहिल्या डावात तो केवळ १ धाव करू शकला, तर दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही. जेम्स अँडरसनने उत्कृष्ट चेंडू टाकत त्याचा त्रिफळा उडवला. त्यामुळे रहाणेच्या कसोटी संघातील स्थानाविषयी चर्चा सुरु झाली आहे. भारतात होणाऱ्या कसोटी सामन्यांत रहाणे चांगली कामगिरी करत नसल्याचे म्हटले जाते. स्वतः रहाणे मात्र या मताशी सहमत नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक

माझ्या भारतातील कामगिरीबाबत नेहमीच चर्चा होते. मात्र, आता आम्ही दोन वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी सामने खेळत आहोत. आमची अखेरची भारतातील कसोटी मालिका ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाली होती. त्या मालिकेतील मी चांगली कामगिरी केल्याचे तुम्हाला दिसेल, असे रहाणे म्हणाला. रहाणेने त्या मालिकेत ५९ आणि ११५ धावांची खेळी केली होती.

संघाचे यश सर्वात महत्वाचे

माझ्यासाठी संघाचे यश सर्वात महत्वाचे आहे. माझ्या कामगिरीचा संघाला कसा फायदा होऊ शकेल, या गोष्टीचा मी विचार करतो. तुम्ही माझी मागील १०-१५ सामन्यांतील कामगिरी बघा. मी या सामन्यांत धावा केल्याचे तुम्हाला दिसेल, असेही रहाणेने नमूद केले. तसेच त्याने विराट कोहलीच्या जागी भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवण्याच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.


हेही वाचा – दुसऱ्या कसोटी सामन्यात अक्षर पटेल, कुलदीपला संधी?


 

First Published on: February 12, 2021 10:39 PM
Exit mobile version