विराट कोहली, मीराबाई चानू यांना खेलरत्न पुरस्कार

विराट कोहली, मीराबाई चानू यांना खेलरत्न पुरस्कार

विराट कोहली आणि मीराबाई चानूला खेलरत्न

भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. या दोघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

मागील काही काळात उल्लेखनीय कामगिरी 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मागील ३-४ वर्षात अप्रतिम प्रदर्शन केले आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्याच्या कसोटी मालिकेत त्याने ५९३ धावा केल्या होत्या. तो सध्या कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाने क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. तो खेलरत्न पुरस्कार मिळवणारा सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर तिसरा क्रिकेटर ठरला आहे. तर वेटलिफ्टर मीराबाई चानूने २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. २०१७ मध्ये मीराबाई चानूने जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत विश्‍वविक्रम केला होता. तिने ४८ किलो वजनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.

 

नीरज चोप्रा, राही सरनोबत, हिमा दासला अर्जुन पुरस्कार

एशियाड स्पर्धा आणि त्याआधीच्या स्पर्धांतील अप्रतिम कामगिरीबद्दल भालाफेकपटू नीरज चोप्रा, नेमबाज राही सरनोबत, धावपटू हिमा दास यासारख्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार घोषित झाला आहे. अर्जुन पुरस्कारही मागील चार वर्षातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो.

 

First Published on: September 20, 2018 7:28 PM
Exit mobile version