IPL मध्ये खेळायला मिळालं नाही; मुंबईच्या क्रिकेटरची आत्महत्या

IPL मध्ये खेळायला मिळालं नाही; मुंबईच्या क्रिकेटरची आत्महत्या

आयपीएलमध्ये निवड झाली नाही म्हणून मुंबईच्या क्रिकेटरची आत्महत्या

IPL मध्ये निवड झाली नाही म्हणून मुंबईतील युवा क्रिकेटपटूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. करण तिवारी (२७) असं या खेळाडूचं नाव आहे. करण तिवारीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण तिवारी मालाड पूर्व भागातील जानू कंपाऊंडमध्ये इमारतीत आई आणि भावासोबत रहायचा. स्थानिक पातळीवर तो क्रिकेट खेळत होता. आयपीएलसाठी तो तयारीही करत होता. मात्र, आयपीएलमध्ये निवड न झाल्याने त्याने आत्महत्येसारख टोकाचं पाऊल उचललं.

कोरोनाच्या संकटात सापडलेल्या आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरु होणार आहे. आयपीएल संघातील खेळाडूंची निवड देखील झाली. याबाबतची माहिती करण तिवारीला मिळाली. मात्र, त्याची कोणत्याच संघात निवड न झाल्याने तो नाराज होता, असं बोललं जात आहे. करणने १० ऑगस्टला रात्री १०.३० ला राजस्थानमध्ये राहणाऱ्या त्याच्या मित्राला फोन केला. फोनवर त्याने आयपीएलमध्ये निवड न झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याची माहिती त्याने मित्राला दिली. त्यानंतर त्याच्या मित्राने राजस्थानमध्ये असलेल्या करणच्या बहिणीला फोन केला आणि याबाबतची माहिती तिला दिली. त्याच्या बहिणीने तातडीने मुंबईला तिच्या आईला फोन करत सर्व माहिती दिली. माहिती मिळताच त्याची आई आणि भाऊ त्याच्या खोलीपर्यंत पोहोचायच्या आधीच करणने गळफास घेतला, अशी माहिती आहे. घरातील चादर पंख्याला लटकावून करणने आत्महत्या केली.

करणच्या कुटुंबाने करणच्या आत्महत्येची माहिती कुरार पोलिसांना दिली. पोलिसांनी करणच्या आत्महत्येची नोंद अपघाती मृत्यू म्हणून केली असून पुढील तपास सुरु केला आहे. करण हा गुणवान खेळाडू होता. कोणत्याही परिस्थितीत आयपीएल खेळणे हे त्याचं ध्येय होतं, असं त्याचे निकटवर्तियांनी सांगितलं. मात्र, करणचे हे ध्येय त्याच्यावर हावी झालं आणि निवड न झाल्यामुळे नैराश्यात गेला. यामुळे त्याने आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेतला.


हेही वाचा – ४८ तासात जाहीर माफी मागा; सुशांतच्या भावाची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस


 

First Published on: August 12, 2020 12:49 PM
Exit mobile version