IPL 2021 : भारतीय संघातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉला होती ‘या’ गोष्टीची चिंता!   

IPL 2021 : भारतीय संघातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉला होती ‘या’ गोष्टीची चिंता!   

पृथ्वी शॉ

दिल्ली कॅपिटल्सचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने यंदाच्या आयपीएल मोसमाची चांगली सुरुवात केली आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या ७२ धावांची, तर पंजाब किंग्सविरुद्ध ३२ धावांची आक्रमक खेळी केली. मात्र, पृथ्वीने मागील आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी केली होती. त्यानंतर भारताकडून खेळताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याने निराशा केली. पहिल्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली आणि तो दोन डावांत मिळून केवळ ४ धावा करू शकला. तो दोन्ही डावांमध्ये बोल्ड झाला. त्यामुळे भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यासह काही माजी क्रिकेटपटूंनी त्याच्यावर टीका केली होती. त्याला भारतीय संघातून बाहेरही काढण्यात आले. भारतीय संघातून वगळण्यात आल्यावर पृथ्वीला फलंदाजीच्या तंत्राबाबत चिंता होती.

मला चूक सुधारायची होती

ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या कसोटी सामन्यानंतर मला संघातून वगळण्यात आले. त्या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी मला क्लिन बोल्ड केले होते. त्यामुळे मला माझ्या फलंदाजीच्या तंत्राबाबत (टेक्निक) चिंता होती. मी अशाप्रकारे का बाद होत आहे, याचा खूप विचार केला. मला चूक सुधारायची होती. मी माझ्या फलंदाजीच्या तंत्रावर अधिक मेहनत घेण्यास सुरुवात केली. गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधी मी अधिक स्थिर उभा राहण्याचा प्रयत्न केला, असे पृथ्वी म्हणाला.

…आणि धावा करण्यात यश आले

ऑस्ट्रेलियाहून परत आल्यानंतर मी माझे प्रशिक्षक प्रशांत शेट्टी आणि प्रवीण आमरे यांच्यासोबत माझ्या फलंदाजीवर काम केले. मी माझ्या फलंदाजीच्या तंत्रात थोडा बदल केला. त्यानंतर झालेल्या विजय हजारे स्पर्धेत मी माझा नैसर्गिक खेळ केला आणि मला धावा करण्यात यश आले, असेही पृथ्वी म्हणाला. पृथ्वीने विजय हजारे स्पर्धेत ८ सामन्यांत तब्बल ८२७ धावा केल्या होत्या.

First Published on: April 19, 2021 4:43 PM
Exit mobile version