दुबईमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा ४ देशांच्या स्पर्धेचा प्रस्ताव मांडणार आहे. पीसीबी अध्यक्ष जेव्हा बैठकीत प्रस्ताव मांडतील त्यावेळी बीसीसीआयचे हायकमांड देखील उपस्थित राहणार आहेत. यामध्ये रमीझ राजा यांच्या प्रस्तावावर सहमती दर्शवण्यात येणार आहे. रमीझ राजा यांचा प्रस्ताव टी-२० टूर्नामेंटसाठी असणार आहे. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त दोन टीम इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या असणार आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून यावर एकमत होणे अपेक्षित नाहीये. कारण सध्याच्या ICC नियमांनुसार, सदस्य मंडळ तीन देशांच्या स्पर्धांचे आयोजन करू शकते. कारण फक्त जागतिक संस्थेला त्यापेक्षा जास्त स्पर्धा आयोजित करण्याचा अधिकार आहे.
आयसीसी दरवर्षी स्पर्धा आयोजित करू शकते, ज्याद्वारे मीडियाचे अधिकार आणि इतर व्यावसायिकांच्या माध्यमातून ७५ कोटी डॉलरचा महसूल मिळू शकतो. या चार देशांच्या टी-२० सुपर लीग स्पर्धेच्या प्रस्तावात भारताला चार सहभागी देशांपैकी एक म्हणून स्थान देण्यात आले आहे. १० एप्रिल रोजी आयसीसी बोर्डाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्याची रमीझ यांची योजना आहे.
या प्रस्तावानुसार भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त या स्पर्धेत सहभागी होणारे इतर संघ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आहेत. स्पर्धेच्या यजमानाची निवड चार सहभागींमधून रोटेशन पद्धतीने केली जाणार आहे. मात्र, बीसीसीआय या स्पर्धेला मान्यता देणार की नाही, यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आमचा फ्युचर टूर प्रोग्रॅम पूर्णपणे भरलेला आहे. याशिवाय, इतरही अनेक गोष्टी आहेत. पाकिस्तानसोबत खेळण्याच्या बाबतीत आयसीसी स्पर्धांमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये. तसेच, आयसीसी चार देशांच्या स्पर्धा आयोजित करण्यास तयार होईल, असे आम्हाला वाटत नाही. रमीझ राजा यांचा प्रस्ताव फेटाळला जाऊ शकतो, असं अधिकारी म्हणाले.
हेही वाचा : देशामध्ये धर्माच्या नावावर नागरिकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, शरद पवारांचा आरोप