भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शनिवारपासून सुरुवात झाली. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली होती. मात्र, रोहित शर्मा (१६१) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (६७) यांनी शतकी भागीदारी केल्याने भारताने पहिल्या दिवसअखेर ३०० धावांची मजल मारली. पहिल्या दिवशी रोहितने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने २३१ चेंडूत १८ चौकार आणि २ षटकांराच्या मदतीने १६१ धावांची खेळी केली. परंतु, जॅक लिचच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. त्यानंतर आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला रिषभ पंत फलंदाजीला आला. तो फलंदाजीला आल्यावर त्याच्यात आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्समध्ये हुज्जत झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांना थांबवण्यासाठी पंचांना दोघांच्या मध्ये यावे लागले.
Dont mess with Rishabh pant 😎 pic.twitter.com/9omfnbbtND
— Yatharth gupta (@yoyoyatharth) February 13, 2021
वसिम जाफरनेही केले ट्विट
भारताच्या डावातील ८७ व्या षटकात पंत आणि स्टोक्समध्ये शाब्दिक चकमक झाली. हे षटक इंग्लंडचा कर्णधार जो रूटने टाकले आणि स्टोक्स स्लिपमध्ये उभा होता. या दोघांमध्ये हुज्जत सुरु झाल्यानंतर चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी पंतच्या नावाची घोषणा करण्यास सुरुवात केली. अखेर पंच वीरेंद्र शर्मा यांना मध्ये येत पंत आणि स्टोक्सला शांत करावे लागले. या दोघांमधील शाब्दिक चकमकीवर भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफरनेही ट्विट केले.
“Jab tak ye khel khatam Nahi hota apun idharich hai!” #INDvsENG pic.twitter.com/OqIudUdlGR
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 13, 2021