गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. मुंबईला आतापर्यंत ९ पैकी ६ सामने जिंकण्यात यश आले आहे. मुंबईच्या या यशात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबईच्या संघात अनुभवी फिरकीपटूची कमतरता आहे असे नेहमी म्हटले जाते. हरभजन सिंगने अनेक वर्षे मुंबईच्या फिरकीची धुरा सांभाळली होती. मात्र, त्याने हा संघ सोडल्यापासून फिरकी ही मुंबईची कमकुवत झाली आहे, अशी टीका होते. मात्र, युवा लेगस्पिनर राहुल चहरने मागील मोसमात आणि यंदाही चांगली कामगिरी केली आहे. यंदाच्या मोसमात त्याने आतापर्यंत ९ सामन्यांत ११ विकेट घेतल्या आहेत. त्याने या यशाचे श्रेय मुंबई संघाचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट आणि भारताचा माजी गोलंदाज झहीर खानला दिले आहे.
त्याचा सल्ला नेहमीच कामी येतो
मला काही अडचण असल्यास मी झहीर खानकडे जातो. तो मला गोष्टी समजावून सांगतो. त्याचा सल्ला मला नेहमीच कामी येतो. त्याला मी कशी गोलंदाजी करतो, हे माहित आहे. मी गोलंदाजी करत असताना, तो तिथे येऊन तासभर बसतो. मागील वर्षी तर त्याने माझ्यासोबत वेगळे सत्रही घेतले. मी गोलंदाजीत काय चुका करत आहे हे सांगितले. माझ्या अडचणी त्याने समजून घेतल्या आणि त्यावर तोडगा सांगितला. मी सुरुवातीला खूप सावध गोलंदाजी करायचो. मात्र, ‘तू आक्रमक गोलंदाज आहेस. फलंदाज चौकार-षटकार मारणारच. तू त्याची काळजी करू नकोस. तू विकेट घेण्याचा विचार कर’, असे झहीरने मला सांगितले. त्याचा सल्ला माझ्या कामी आला. त्यामुळे आता मला काहीही विचारायचे असल्यास मी झहीरकडे जातो. तो नेहमी मला मदत करतो, असे राहुल चहर म्हणाला.