नगरसेवकांचा आवाज म्यूट केल्याचा आरोप

नगरसेवकांचा आवाज म्यूट केल्याचा आरोप

महासभेमध्ये नगरसेवकांचा आवाज म्यूट केला जात असल्याच्या मुद्यावर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण हे पुन्हा आक्रमक झाले. १६ वर्षे एकाच जागेवर बसलेल्या अधिकार्‍यांकडून जाणीवपूर्वक नगरसेवकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करीत अशा अधिकार्‍यांच्या विरोधात आपण सुप्रिम कोर्टापर्यंत लढा देऊ, असा इशाराही पठाण यांनी दिला आहे.

ठाणे महानगर पालिकेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये शानू पठाण यांनी पुन्हा एकदा सभागृहात नगरसेवकांचा आवाज दाबला जात असल्याच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा धारण केला.
हजारो मतांच्या फरकाने निवडून येणारे नगरसेवक हे आपल्या प्रभागाच्या समस्या मांडून त्यांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने सभागृहामध्ये आपले मत मांडत असतात. मात्र, सध्या कोरोनाच्या नावाखाली घेण्यात येत असलेल्या ऑनलाईन महासभेत प्रशासनाला अडचणीत आणणारे प्रश्न विचारले की लगेचच संबधित नगरसेवकाचा आवाज म्यूट करण्यात येत असतो.

जे अधिकारी एकाच जागेत १६-१६ वर्षे ठाण मांडून बसलेले आहेत. अशा अधिकार्‍यांकडूनच नगरसेवकांचा आवाज दाबला जात आहे. हजारो लोकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या नगरसेवकांचा आवाज दाबणे म्हणजे जनतेचा आवाज दाबण्यासारखेच आहे. यासीन कुरेशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नगरसेवकाला आपल्या न्याय्य मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा द्यावा लागत आहे. यावरुनच हे प्रशासन किती बेरकी आहे, याचा अंदाज येत आहे. जर नगरसेवकांनाच न्याय मिळत नसेल तर ते जनतेला काय न्याय देणार ? असा सवाल आता जनतेमधूनच उपस्थित होणार आहे. नगरसेवक राष्ट्रवादीचा असो, की सेना-भाजप-काँग्रेसचा, त्यांचा आवाज दाबला जाणार असेल तर ते अजिबात सहन करणार नाही. जे अधिकारी असे कृत्य करीत आहेत. अशा अधिकार्‍यांच्या विरोधात आपण थेट सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊ, असा इशाराही यावेळी शानू पठाण यांनी दिला.

First Published on: February 24, 2021 8:02 PM
Exit mobile version