जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांविरुद्ध गुन्हे; कल्याण डोंबिवलीतील चार पोलीस ठाण्यात नोंद

जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांविरुद्ध गुन्हे; कल्याण डोंबिवलीतील चार पोलीस ठाण्यात नोंद

जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल; कल्याण डोंबिवलीतील चार पोलीस ठाण्यात नोंद

कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरली नसून सर्वाना नियमाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करीत कारवाई केली जाते आहे. त्यातच भाजपने कल्याण डोंबिवलीत जनआशीर्वाद यात्रा काढून नागरिकांची गर्दी जमविल्याने कोरोना नियम पायदळी तुडवले. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील मानपाडा, कोळसेवाडी, महात्मा फुले, आणि खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार डझनभराच्यावर आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

 

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचे आदेशाचे पालन बंधनकारक असतानाच ठाणे जिल्ह्यात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा गेल्या दोन दिवसापासून ठिकठिकाणी काढण्यात येत आहे. हि यात्रा १९ ऑगष्टपर्यत सुरु राहणार असून या यात्रेत मनाई आदेशाचे उल्लंघन करत नागरिकांना एकत्र जमा करणे, मास्कचा वापर न केल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आयोजकांवर कल्याण डोंबिवलीतील चार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास जन आशीर्वाद कार्यक्रमात वेळी डोंबिवली नागरीक सहकारीबँक चौकात, सोनारपाडा कल्याण शिळ रोद येथे जन आशीर्वाद यात्रा काढून नियमांचे पालन न केल्याप्रकरणी भाजप पदाधिकारी मोरेश्वर भोईर, नंदू परब, भाजपचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, संजय उर्फ बबलू तिवारी, दत्ता माळेकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

 

बुधवारी कल्याणाच्या दुर्गाडी किल्ल्याच्या पायथापासून सुरु झालेल्या जन आशीर्वाद यात्रा कल्याण पश्चिम, टिटवाळा मार्गे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरला यात्रा विविध मार्गावरून सुरु आहे. मात्र यात्रेमुळे एक ते अर्धातास वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर उद्या १९ ऑगस्ट रोजी मुरबाड, शहापूर, मार्गे भिवंडीत येऊन यात्रेची सांगता होणार आहे. त्यामुळे उल्हासनगर, अंबरनाथ , बदलापूर , मुरबाड, शहापूर, भिवंडी या शहरातील विवीध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने जन आशीर्वाद यात्रेवर गुन्हे दाखल होण्याचे सावट पसरले आहे.

 

हे ही पहा- ठाणे पालिकेच्या रुग्णालयात चिकनगुनियाचे इंजेक्शनच नाही; महासभेत धक्कादायक बाब उघडकीस

First Published on: August 18, 2021 8:07 PM
Exit mobile version