महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, मध्य प्रदेश सरकारचा अहवाल गृहित धरत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्यास परवानगी दिली आहे. यानंतर महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हातात असते तर –
ओबीसी आरक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात असते तर मी त्यांच्या शेजारी ठाण मांडून करून घेतले असते, ओबीस आरक्षण हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर आधारीत आहे. सर्वोच्च न्यायालयात हा विषय असून त्यावर राजकारण करणे ही आपली प्रगल्भता नाही. प्रगल्भता असेल तर तुम्हा मान्य करावे लागेल की हे सर्व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, असे जितेंत्र आव्हाड यांनी म्हटले आहे . पुढे बोलताना त्यांनी ज्या पद्धतीने बांठिया आयोग काम करतोय, डाटा गोळा करतोय त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल १०० टक्के महाराष्ट्राच्या बाजूने लागेल व ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असे म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांना टोला –
हनुमान चालिसा सोडून पेट्रोल- डिझेलवर बोलतायत हे नसे थोडके असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. राज्य सरकारने पेट्रोल- डिझेलवरील मुल्यवर्धित करात कपात केल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टिका केली होती. यावर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. उशिरा का होईना पेट्रोल, डिझेल, गरीबांचे रोजगार याबद्दल त्यांना जाणीव होते आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.