केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे गरीब मध्यमवर्गीयांचे नुकसान

केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे गरीब मध्यमवर्गीयांचे नुकसान

केंद्र सरकारने एकाच दिवशी ३ शेतकरी विरोधी कायदे संमत केले, कारण नसताना ८०० कोटी खर्च करून नवीन संसद इमारतीच्या कामाला मंजुरी दिली, कामगार विरोधी कायदे करून गरीब व मध्यमवर्गीयांचे जीवन उद्धवस्त केले आहे. अशा मानसिकतेच्या भाजप पक्षाला मुळासकट उखडून टाका असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केला आहे.

अंबरनाथ येथील आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करतांना सुप्रिया सुळे यांनी भाजप केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली, अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या की महिलांना आणि तरुणांना संधी द्यावी आणि स्थानिक पातळीवर कार्यकारिणी नियुक्ती करावी, त्याचप्रमाणे ओबीसी सेलच्या अध्यक्षांची निवड करावी. तसेच शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या कार्यकाळात पक्षात मोठ्या प्रमाणात इनकामिंग सुरू आहे, त्यांनी पक्षाला उभारायचे काम केले आहे , निवडणूक लक्षात ठेवून इतर पक्षातून राष्ट्रवादी पक्षात काही नेते आले आहेत. त्यांच्याऐवजी पक्षाचे एकनिष्ठ आणि पडत्या काळात पक्षाची साथ न सोडणाऱ्यांना संधी द्यावी.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले की अंबरनाथ हे खऱ्या अर्थाने कामगारांचे शहर आहे, या शहरात अनेक नामवंत कंपन्या होत्या त्या आता बंद झाल्या आहेत, राज्य सरकार या ठिकाणी पुन्हा रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे व नवीन उद्योग आणण्याचा प्रयत्न करणार . कामगार व दलित चळवळीतील जेष्ठ नेते श्याम गायकवाड यांचा आव्हाड यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला , त्यांना राष्ट्रवादी पक्षात आणा असे त्यांनी स्थानिक नेत्यांना सांगितले. सध्या राजकारणापासून श्याम गायकवाड हे दूर असल्याने त्यांचा आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

यावेळी नुकतेच रिपाईतुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कबीर गायकवाड यांचे भाषण लक्षवेधी ठरले ते म्हणाले की आम्ही रिपाई (आठवले) पक्षासोबत निष्ठेने काम केले. मात्र पक्षाच्या नेत्यांनी जातीवादी पक्षासोबत युती केल्याने आमचा भ्रमनिरास झाला. याच वेळी शरद पवार यांच्या साताराच्या भर पावसातील भाषणाने मी अत्यंत प्रभावित झालो. त्याचवेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस धनंजय सुर्वे यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. अशावेळी सुर्वे यांच्या निवासस्थानी जाऊन सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, प्रमोद हिंदुराव, शहर अध्यक्ष सदाशिव पाटील व अन्य नेत्यांनी सांत्वन केले.

First Published on: February 22, 2021 3:56 PM
Exit mobile version