महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आपला विभाग सक्षम करावा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आपला विभाग अधिक सक्षम करावा अशी महत्वपूर्ण सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पाणीपुरवठा आणि मलनिसारण विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी ऑनलाइन व्हीसीद्वारे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थेकडे राज्यातली अनेक महत्वाची काम सुरू असली, तरीही ती पूर्ण करण्याची गती वाढवण्याची गरज आहे. राज्याच्या विकासातील महत्वाचा घटक असलेल्या या प्राधिकरणाने त्यासाठी वेगाने हालचाली करण्याची गरज शिंदे यांनी व्यक्त केली. प्राधिकरणातील काम पूर्ण करण्यासाठी तज्ज्ञ संस्थांची मदत घेणे तसेच एमएसआरडीसीच्या धर्तीवर या विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दिलेले काम प्राधिकरण वेळेत पूर्ण करते अशी खात्री पटली तरच राज्यातील महानगरपालिका अनेक काम तुमच्याकडे देतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

त्यांनी केलेल्या सूचनेनुसारच अनेक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपन्यांच्या सहकार्याने यापुढे काम करण्याचे प्राधिकरणाने निश्चित केले असल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी  टाटा कन्सल्टन्सी, शहा कन्सल्टन्सी, प्राइमो कन्सल्टन्सी, पुराणिक व्हेचर्स, एमएसपी इंटरनॅशनल यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांची मदत घेणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. तसच कंत्राटी पध्दतीने अभियंते आणि उपअभियंते यांची रिक्त पदे भरून हा विभाग गतिमान करणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला पाणी पुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील, या खात्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे, नगरविकास विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक आणि संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

First Published on: May 13, 2021 3:52 PM
Exit mobile version