साखरपुड्यात ब्रँडेड कुंकू वापरले नाही, नवर्‍याच्या कुटुंबाने लग्न मोडले

साखरपुड्यात ब्रँडेड कुंकू वापरले नाही, नवर्‍याच्या कुटुंबाने लग्न मोडले

साखरपुड्याच्या दिवशी ब्रँडेड कुंकू का वापरले नाही, या वादातून श्रीमंतीत वाढलेल्या नवर्‍या मुलाने आणि त्याच्या कुटुंबियांकडून लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील वाडा येथे घडला. विचित्र मागणीवरून लग्न मोडणार्‍या नवर्‍या मुलासह चार जणांविरुद्ध गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा वाडा पोलिसांनी दाखल केला आहे. नीरज पाटील, सुधाकर पाटील (वडील), नयना पाटील (आई), कमलाकर पाटील (काका) असे लग्न मोडणार्‍या नवरा मुलगा आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.

भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथील मूळ रहिवासी असणारे सुदाम उर्फ सुधाकर विठ्ठल पाटील, सध्या मुक्काम वसई यांनी त्यांच्या सिव्हिल इंजिनिअर असणार्‍या मुलाचे लग्न वाडा तालुक्यातील एका सुसंस्कृत कुटुंबातील उच्च शिक्षित मुलीबरोबर ठरवले होते. हे लग्न जमण्यासाठी मुलाचे काका आणि महसूल विभागात असणारे कमलाकर विठ्ठल पाटील त्यांनी पुढाकार घेतला होता. त्या अनुषंगाने हे लग्न जमल्यानंतर ३० ते ४० लोकांच्या उपस्थितीत टीळा (कुंकू) लावण्याचा कार्यक्रम पार पडला होता. हा कार्यक्रमात मुलीच्या वडिलांकडून मुलाचे आणि त्याच्या कुटुंबाचा आदरसत्कार करून सर्वांना ब्रँडेड कपडे भेट म्हणून दिले होते. जेवणाचा बेत आखण्यात आला होता. सर्व काही व्यवस्थित पार पडल्यानंतर दुसर्‍या दिवशी साखरपुड्याची तारीख ठरविण्यासाठी नवरी मुलीच्या वडिलांनी नवर्‍या मुलाला व त्याच्या काकांना विचारणा केली.

मात्र, नवर्‍या मुलाने ही सोयरीक जमणार नाही म्हणून चक्क लग्नाला नकार दिला. त्यामुळे मुलीच्या वडिलांना धक्का बसला. त्यांनी लग्न मोडण्याचे कारण विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. या प्रकारामुळे मुलीकडील कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली आले, त्यांनी अखेर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. वाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांनी नवरा मुलगा आणि त्याच्या कुटुंबाला पोलीस ठाण्यात येण्यासाठी निरोप पाठवला. नवरा मुलगा आणि त्याचे कुटुंब पोलीस ठाण्यात येताच पोलिसांनी त्यांना लग्न मोडण्याचे कारण विचारताच त्याचे उत्तर ऐकून पोलीस देखील गोंधळात पडले. टिळा लावण्याच्या कार्यक्रमावेळी मुलीच्या कुटुंबियांनी वापरलेले कुंकू हे ब्रँडेड नव्हते, ते हलक्या दर्जाचे होते आणि मुलीची आई माझ्या सोबत एकही शब्द बोलली नाही म्हणून आम्ही लग्न मोडत आहोत, असे नवरा मुलाने पोलिसांना सांगितले.

First Published on: March 5, 2021 5:45 AM
Exit mobile version