भिवंडी महानगरपालिका प्रभाग समिती 5 अंतर्गत अनेक ठिकाणी सुरु असलेले अवैध बांधकाम आणि धोकादायक इमारतींबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही कारवाई केली जात नव्हती. अशा तक्रारी मनपाचे आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्याकढे वाढू लागल्याने त्यांनी प्रभाग समिती पाच मधील अधिकार्यांची बदली केल्याने पालिकेत आणि शहरात खळबळ माजली आहे.
प्रभाग समिती क्रमांक पाचचे सहा.आयुक्त सुनील भास्कर भोईर यांच्यावर मागील महिन्यात निलंबनाची कारवाई होऊन त्यांना पुन्हा त्याच जागी नियुक्ती केल्यानंतर कामामध्ये कोणतीही प्रगती झाली नाही. त्यामुळे आयुक्तांकडे तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर भोईर आपल्या वैयक्तिक कारणामुळे रजेवर होते. त्यातच अभय योजनांतर्गत व्याज माफी द्वारा करवसुलीवर देखील परिणाम झाला. या घटनेची दाखल घेत आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी सहा.आयुक्त सुनील भोईर यांची बदली बारनिशी विभागात केली आणि त्यांच्या जागी राजू वरळीकर यांची सहा.आयुक्त म्हणून नेमणूक केली. तसेच बारनिशी विभागाचे प्रमुख माणिक जाधव यांची प्रभाग समिती पाचच्या अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे.